मुंबईत कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे मुंबईकरांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच दुसरीकडे महापालिकेने ही आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र,आतापर्यंत प्राप्त झालेल्या २४ विभाग कार्यालयांच्या तुलनेत १३ विभागांमध्ये शंभरहून अधिक कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पाहता निम्म्यापेक्षा अधिक मुंबईत कोरानोचा हाहाकार माजल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे सहा दिवसांमध्ये १५०९ रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
मुंबईत २१ एप्रिलपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ही ३ हजार ४४५ एवढी झाली आहे. मात्र,यापैंकी ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. प्रभादेवी-वरळीच्या जी-दक्षिण परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४८७ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल भायखळा,नागपाडा ई विभागातही साडेतीनशे पार करोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. तर धारावी,माहिम व दादर या जी-उत्तर विभागातही कोरोनाग्रस्तांची संख्या २५१ वर पोहोचली आहे. कुला एल विभागात २४०, तर शीव-वडाळा या एफ-उत्तर विभागात २२८, विलेपाले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिम २२३, ग्रँटरोड, मलबारहिल या डि विभागात २०७ कारोना रुग्ण आढळून आले आहे.
याव्यतिरिक्त विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या के-पूर्व विभागात १८१, वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्व या १५४, गोवंडी,मानखुर्द या एम-पूर्व विभागात १४९, परेल,शिवडी,लालबाग या एफ दक्षिण विभागात ११९, नरीमन पॉईंट,फोर्ट या ए विभागात ११८, चेंबूर, देवनार या एम-पश्चिम विभागात १०४, कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
याशिवाय मालाड पी-उत्तर विभागात ९७, भांडुप एस विभागात ९०, वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच –पश्चिम विभागात ७९, घाटकोपर एन विभागात ७६, कांदिवली आर-दक्षिण विभागात ७१, गोरेगाव पी-दक्षिण विभागातत ६८, मस्जिद बंदर, पायधुणी या बी विभागात ५८,बोरीवली आर-मध्य विभागात ३०, मुलुंड या टी विभागात २३, चिराबाजार, चंदनवाडी या सी विभागात २३ आणि दहिसर आर-उत्तर विभागात २० रुग्ण आढळून आले आहेत.
सहा दिवसांमध्ये वाढले दीड हजार रुग्ण
मुंबईमध्ये १५ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९३६ एवढी होती. परंतु सहा दिवसांमध्ये ही संख्या दुप्पटच्या आसपास वाढली आहे. २१ एप्रिल रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या ३४४५ एवढी झाली आहे. त्यामुळे पहिल्या ३४ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १९३६ एवढी झाली होती. तर पुढील सहा दिवसांमध्ये ही संख्या १५०९ ने वाढली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमधल संक्रमणाचा कालावधीत अधिक जोरात सुरु असल्याचे दिसून येते.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा सन्मान करतो, पण सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य’