कोणताही जाहिरातदार हा शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. शिवसेनेचे धोरण मी ठरवतो आणि ते सामनातून मांडले जाते. नाणार प्रकल्पाला विरोध कायम राहणारच आहे याचा पुर्नउच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला. कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नाणार प्रकल्पाविरोधी भूमिका शिवसेनेने जाहीर केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी सामना वृत्तपत्रात छापलेल्या नाणार प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या जाहिरातीमुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला होता. मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांनी यावर आक्षेप घेत थेट सामनाचे कार्यालय गाठले होते. यावेळी जाब विचारणारे पत्रकही सामनाच्या संपादकांच्या नावे देण्यात आले. मात्र यावर शिवसेनेने आतापर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट केली नव्हती. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मात्र जाहिरातीच्या विषयाचा उलघडा झाला आहे. नाणार सर्थनार्थ आलेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बद्धकोष्ठ दूर करण्याचीही आम्ही जाहीरात देतो असेही विधान केले. त्यामुळे याबाबत कोणीही विचारणा करत नाही असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
एलईडी मासेमारी पुर्णपणे बंद करणार
कोकणात चालणाऱ्या अनधिकृत एलईडी मासेमारीवरही त्यांनी वक्तव्य केले. मोठे धेंडे मासेमारी करुन आपला परिसर दुषित करतात. त्यामुळे कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोस्टगार्ड, पोलीस असे संयुक्त कृतीदल बनवत आहोत. केंद्राचा कायदा आहेच. पण राज्याचा कायदा आणखी कडक करुन एलईडी मासेमारी बंद करण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले. चिपी विमानतळाची पाहणी करुन तिथे देखील बैठक घेणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संपुर्ण विमानतळाचे काम हे कधीपर्यंत ते पुर्ण होणार याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा – एल्गार-भीमा कोरेगाव आणि CAA-NRC; मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका