घरCORONA UPDATEपूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा - उपमुख्यमंत्री अजित पवार

पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाचशेच्या घरात पोहोचली आहे. मात्र, तरीदेखील घरातच न थांबता बाहेर पडून इतरांचं
आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रकार अनेकजण करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या
मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि डॉक्टरांपासून पोलिसांपर्यंत सगळेच घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. त्याचप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील येत्या सोमवारी असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. ‘कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे. त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती आणि त्याच रात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी’, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

मोजक्या मंडळींमुळे धक्का!

‘राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलीस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशन दुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

जनता सूज्ञ…

‘कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई येणाऱ्या काळात केली जाईल’, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. कोरोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातच थांबून, कोरोनाचं संकट परतवून लावूया’, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -