घरची परिस्थिती बेताची असल्या कारणास्तव शिक्षण आणि रहिवासासाठी नवी मुंबई, कळंबोली येथील एका आश्रमात वास्तवास असलेल्या तीन अल्पवयीन मुलावर आश्रमातीलच तीन काळजीवाहकांनी वारंवार लैगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सोमवारी रात्री कळंबोली पोलिसांनी आश्रमाच्या दोन आरोपींना अटक केले. तिसरा आरोपी उन्हाळ्याच्या सुट्यांच्या निमित्ताने गावी गेला होता, तो परत न आल्यामुळे त्याला अजून अटक करता आलेले नाही.
आई-वडिलांचा फुले विकण्याचा व्यवसाय
पीडित मुलांचे आई-वडिल फुले विकण्याचा व्यवसाय करतात. नालासोपाऱ्याला ते वास्तव्यास आहेत. आपल्या उत्पन्नातून घर चालविण्यास अडचणी येत असल्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना कळंबोलीच्या आश्रमात रहिवासासाठी पाठवले होते. कळंबोलीतील हे आश्रम विक्रोळीच्या एका चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत चालविले जाते. आश्रमात राहणाऱ्या मुलांचा शैक्षणिक खर्चाचा भारही ट्रस्ट उचलते. तिघंही मुलं एका खाजगी शाळेत इयत्ता ५वी, ६वी आणि ९वी मध्ये शिकत आहेत.
फेब्रुवारीपासून वारंवार लैगिंक शोषण
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी सांगितले की, ‘सुट्टीच्या निमित्ताने मुले आपल्या आई-वडिलांकडे नालासोपारा येथे गेले होते. मात्र पुन्हा आश्रमात परतण्यास मुलांनी नकार दिला. फेब्रुवारीपासून आपले लैंगिक शोषण होत असल्याचे पीडित मुलांनी आपल्या आई-वडिलांना सांगितले.
आश्रमाच्या ट्रस्टींनाही अटक
आश्रमाच्या ट्रस्टींनी टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आश्रमाच्या काळजीवाहकांना अटक केल्याप्रकरणी मी कळंबोली पोलिस स्थानकात चौकशीसाठी गेलो. आश्रमाच्या प्रशासनाला न विचारात काळजीवाहकांना केलेल्या अटक प्रकरणी जाब विचारला म्हणून पोलिसांनी मलाही अटक केले. सरकारी कामात अडथळा निर्माण करत असण्याचे कारण सांगत पोलिसांनी मलाही अटक केले.’