कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा गैरफायदा घेत मुंबईतील ५०० गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांची व्यवस्थापन समिती तयार न करता परस्पर पुनर्विकासाचे प्रस्ताव बिल्डरांना मंजूर करून दिल्याची तक्रार भाजप आमदार आशिष शेलार यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे केली आहे. यात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्याची एसटीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे.
कोविडचा फायदा घेत मुंबईत 500 गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्रशासकांनी सर्वसाधारण सभा, सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती न करता परस्पर पुनर्विकासाचे प्रस्ताव बिल्डरांना मंजूर करुन दिले. त्याला तातडीने स्थगिती देऊन एसआयटी मार्फत चौकशी करा, असे सहकार आयुक्तांना विनंती पत्र! pic.twitter.com/NmegkYuKGI
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 9, 2021
कोरोनाच्या काळात गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणुका न झाल्याचा फायदा घेत मुंबईतील विविध निबंधकांच्या निर्देशानुसार मुंबईतील ५०० हून अधिक सहकारी गृहनिर्माण संस्था प्रशासकांनी ताब्यात घेतल्या आहेत. ज्या सोसायटीच्या समितीचा कालावधी गेल्या दोन वर्षात संपत होता, त्यांना कोरोनामुळे निवडणुका वेळीच घेता आल्या नाहीत. त्यामुळे यातील बहुतांश सोसायटीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत,असे तक्रारीत नमूद केले आहे.
अनेक प्रशासकांनी बिल्डर्सच्या संगनमताने, सोसायटी व्यवस्थापन समितीच्या अनुपस्थितीत आणि नियमांचे उल्लंघन करून परस्पर सोसायटीच्या पुनर्विकासाचे निर्णय घेतले आहेत. प्रस्तावित नियम डावलून प्रशासकांनी बिल्डरांशी संगनमत करुन केलेले हे सगळे निर्णय भ्रष्टाचाराची शंका यावी अशा पध्दतीने घेतल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोसायटीच्या प्रशासकांनी सर्वसाधारण सभा किंवा सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती न करता घेतलेले सर्व पुनर्विकासाचे प्रस्ताव तातडीने स्थगित करावे आणि प्रचलित नियमाप्रमाणे निवडलेल्या सदस्यांकडून नव्याने मान्यता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ज्या प्रशासकांनी कायद्यांचा भंग करुन बिल्डरांशी संगनमत करुन निर्णय घेतले त्या प्रशासकांवर एफआयआर दाखल करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी पत्रात केली आहे.