‘आमच्यापेक्षा शिवसेनेची एक जरी जागा जास्त आली, तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल’, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी केले होते. यावर शिवसेना चांगलीच संतापली असून ‘भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पक्षात काय चालले आहे ते पाहावे, शिवसेनेला सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, पाटील शिवसेना चालवत नाहीत, युतीचा निर्णय घेण्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सक्षम आहेत,’ असे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
मागील 4 वर्षांत का भूमिका मांडली नाही?
शिवसेनेबरोबर युती करायचीच होती, तर गेल्या चार वर्षात भाजपने ही भूमिका का मांडली नाही? आताच भाजपला शिवसेनेची आठवण का आली? असा सवालही कदम यांनी उपस्थित केला. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला भेटण्याचे टाळले आहे. अनेक निर्णय प्रक्रियेतही शिवसेनेला डावलण्याची भूमिका घेतली जाते, त्यावेळी शिवसेना आठवते का? असा सवालही कदम यांनी केला.
वाचा नक्की काय म्हणाले ओवेसी – शिवसेना मोदींना घाबरले, त्यांना फक्त आग्रलेख लिहिता येतात
काय म्हणाले होते चंद्रकांत दादा?
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना हटवण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवणे महत्त्वाचे आहे. आधी एकत्र निवडणूक लढवू, निवडणूक एकत्र लढल्यावर निवडून आलेल्या जागांवरून मुख्यमंत्री ठरवता येईल. सेनेची एक जागा जरी जास्त आली तर मुख्यमंत्री सेनेचा होईल‘, असे काल चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच ‘शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना खासगीत भेटून एकत्रित निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू’, असल्याचे देखील ते म्हणाले होते.