मंगळवारी म्हणजेच ९ जुलै रोजी मुंबईतल्या रिक्षा संघटनांनी पुकारलेला संप ८ जुलै रोजी संध्याकाळी मागे घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून हा संप मागे घेत असल्याचं, तसेच मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी दुपारी बैठक होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं होतं. त्यानुसार दुपारी ३ वाजता शशांक राव यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली असून या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे. तसेच, येत्या ३ महिन्यांत यासंदर्भातील समिती अहवाल सादर करेल, असं देखील शशांक राव म्हणाले.
काय झालं बैठकीत?
भाडेवाढ, ओला-उबरची प्रवासी वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक याविरोधात रिक्षाचालक संघटनांनी हा संप पुकारला होता. मात्र, तो आदल्याच दिवशी मागे घेतल्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. यासंदर्भात मुख्यंत्र्यांसोबत शशांक राव यांच्या झालेल्या बैठकीचे तपशील आता समोर आले आहेत. ‘या बैठकीमध्ये आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे सध्यातरी येणाऱ्या काळात आंदोलनाची आवश्यकता असणार नाही. यादरम्यान, कल्याणकारी महामंडळाची स्थापना व्हावी ही मागणी मान्य करण्यात आली असून येत्या ८ दिवसांत अशा समितीचे गठन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे’, असी माहिती शशांक राव यांनी दिली आहे. तसेच, ‘यासंदर्भातल्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, ती समिती येत्या ३ महिन्यांत आपला अहवाल सादर करेल’, अशी माहिती शशांक राव यांनी दिली.
हेही वाचा – नेतृत्व सिद्ध करण्यासाठी शशांक राव यांची खेळी-अनिल परब
अवैध प्रवासी वाहतुकीला बसणार आळा!
दरम्यान, शहरात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर देखील यावेळी चर्चा झाली असून त्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची स्थापना केली जाणार आहे. तसेच, मुक्त रिक्षा परवाने बंद करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे.