मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची गंभीर दखल राज्य सरकार व मुंबई महापालिकेने घेतली आहे. त्यामुळेच यापुढे मुंबईत आणि मुंबईतील मॉलमध्ये आता अँटीजन कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह रिपोर्टशिवाय प्रवेश बंदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
मुंबईत मॉल आणि इतर ठिकाणी होत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढल्याने हा निर्णय घेतला असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.गेल्या काही दिवसंपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल २,८७७ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ट्रेन, मॉल,हॉल, हॉटेल, मंदिरे, दुकाने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीला उधाण आले आहे. परिणामी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
विशेषतः मॉल, थिएटर, हॉल आदी ठिकाणी नागरिकांची जास्त प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता पालिकेने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत येणाऱ्या ट्रेन आणि इतर गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना अँटीजन चाचणी होईल. यामध्ये अहवाल निगेटिव्ह असला तर घरी सोडण्यात येईल. अन्यथा पालिकेच्या क्वारेंटाईन सेंटरमध्ये विलगिकरण करण्यात येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली.