भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या उद्या कोल्हापुरात दाखल होणार आहेत. मात्र सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याच्या राज्य सरकारच्या कारवाईचा निषेध विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीच्या राज्यात महाराष्ट्रात चाललेय तरी काय? ज्या व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार करतो आहे, हे आधी जाहीर केले, त्यांनाच पोलिस स्थानबद्ध करीत आहेत. लोकशाही अस्तित्वात आहे का? अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात येणारी कारवाई पुर्णतः बेकायदेशीर असून आम्ही या कारवाईचा निषेध करतो. आमच्या बाबतीत अशा कितीही कारवाया केल्या तरी आमचा राज्य सरकारविरोधात संषर्घ सुरूच राहील, अशा स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीच्या राज्यात महाराष्ट्रात हे चालले तरी काय❓
ज्या व्यक्तीने ‘पोलिस ठाण्यात तक्रार करतो आहे’, हे आधी जाहीर केले, त्यांनाच पोलिस स्थानबद्ध करीत आहेत.
लोकशाही अस्तित्वात आहे का❓#किरीटसोमय्या #KiritSomaiya— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2021
देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत कारवाईचा निषेध केला. दरम्यान, आपण आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्यांचा आरोप केला आहे. त्यामुळे सरकारचे पितळ उघडे पडणार असल्यानेच या कारवाईच्या माध्यमातून दबावतंत्र अवलंबले जात आहे, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.
मुश्रीफांवर आरोप कोणते?
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका कारखान्याचे ९८ टक्के शेअर बेनामी कंपन्यांच्या नावाने मिळवले आहेत. घोटाळ्याचा पैसा गुंतवला आहे. दुसऱ्या घोटाळ्यातही त्यांनी तसेच केले आहे. तर तिसऱ्या घोटाळ्यात राज्य सरकारचे कशाप्रकारे टेंडरींग होते आणि स्वतःच्या कंपन्यांना कसे कंत्राट देण्यात येते याबाबतचा घोटाळा केला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार घाबरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ बंगल्यांचा घोटाळा केला आहे. शरद पवार देखील घाबरले आहेत. ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांना आम्ही जेलमध्ये पाटवणार असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.