मुंबईतील करीरोड येथील ६० मजल्याच्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली. माहितीनुसार ही आग १९व्या मजल्यावरून लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ ते २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. पण भीषण आगीतून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत असताना दुर्दैवाने त्याचा हात सुटला आणि १९व्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचे नाव अरुण तिवारी असून तो ३० वर्षांचा आहे. सध्या त्याचा मृतदेह परेलच्या केईएम रुग्णालयात आहे.
आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास वन अविघ्न पार्क या बहुमजली इमारतीला अचानक भीषण आग लागल्याचे समजले. त्यानंतर ही आग इतर मजल्यावर पसरत गेली. ही इमारत खूप मोठी असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यास अडथळे निर्माण होत होते. तरी देखील अग्निशमन दलाने इमारतीत अडकलेल्या सर्व रहिवाशांना आणि कामगारांना बाहेर काढले. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यादरम्यान दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. तो १९व्या मजल्यावरील बाल्कनीबाहेर लटला होता, मात्र त्याचा हात सुटला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
#Mumbai: Major fire broke out at Currey Road’s Avighna Park building. The fire broke out on the 19th floor of the 60-floor underconstruction tower.
Fire fighting and rescue Ops underwy. pic.twitter.com/Ej7SK7a6m2— Subodh Kumar (@kumarsubodh_) October 22, 2021
या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि इतर स्थानिक नेते पोहोचले होते. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘अविघ्न इमारतीच्या सिक्युरिटीकडे १५ मिनिट होती, त्या १५ मिनिटात गाद्या टाकल्या असत्या तर अरुण तिवारी नावाच्या व्यक्तीचा जीव वाचवू शकले असते. अग्निशमन दलाचे जवान पोहचताच लगेच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, अनेक लोकांना बाहेर काढलेलं आहे. अद्यापही दोन जण अडकल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तींची कोणत्या परिस्थिती आहे याची माहिती नाही. अद्याप परिसरत धूराचे लोट पसरले आहेत. ही ४ लेवलची आग असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. व्यक्तीच्या मृत्यूवरून अग्निशमन दलाच्या जवानांवर आरोप करणं चुकीचे आहे. या इमारतीमधील अश्निशमन यंत्रणाच बंद होती. याप्रकरणात कडक कारवाई केली जाईल.
हेही वाचा – करीरोडच्या अविघ्न पार्कला भीषण आग, एकाचा मृत्यू