घरCORONA UPDATEशाळा बंद असताना निकाल जाहीर कसा करायचा; सरकारच्या परिपत्रकावर संताप 

शाळा बंद असताना निकाल जाहीर कसा करायचा; सरकारच्या परिपत्रकावर संताप 

Subscribe

लॉकडाऊनमध्ये शिक्षकांचा कोणताच विचार न करता एकतर्फी आदेश जाहीर केल्याप्रकरणी या निर्णयाविरोधात शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन करून तातडीने निकाल जाहीर करण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना दिले आहेत. परंतु घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे शाळेतच असून दीड महिन्यापासून असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळेत जाणे शक्य नाही. त्यामुळे निकाल कसे जाहीर करायचे असा प्रश्न शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये शिक्षकांचा कोणताच विचार न करता एकतर्फी आदेश जाहीर केल्याप्रकरणी या निर्णयाविरोधात शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा व कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे पहिली ते आठवीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे तसेच नववी आणि अकरावीची परीक्षाही रद्द करत त्यांचे शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निकाल दूरध्वनी, एसएमएस किंवा अन्य ऑनलाईन पद्धतीने तातडीने कळवावा, जेणेकरून विद्यार्थ्यां कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहणार नाही. तसेच त्यांना पुढील शिक्षणी वर्षांचा अभ्यास उपलब्ध साहित्यांच्या आधारे करणे शक्य होईल. लॉकडाऊनच्या परिस्थिनुसार विद्यार्थ्यांना निकालपत्र देण्याची आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना परिषदेने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मात्र परिषदेच्या या परिपत्रकामुळे शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या घटक चाचणी, सहामाही निखळाचे कागदपत्रे, रजिस्टर, विद्यार्थ्यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक, मेल आयडी असा सर्व तपशील शाळांमध्ये आहे. लॉकडाऊनमध्ये आम्हाला शाळेत जाणे शक्य नाही. शाळेत जाण्यासाठी शिक्षण विभागाकडून कोणतीही सुविधा नाही. घरातून बाहेर पडल्यावर पोलिसांकडून चोप देण्यात येत आहे, असे असताना आम्ही शाळेत कसे पोहचायचे आणि निकाल कसा जाहीर करायचा असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकाही शाळेत असून त्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणताच निर्णय घेण्यात येत नसल्याने निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीबाबतही सरकारने विचार करावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, प्रथम सत्राचा निकाल, माहितीपुस्तिका शाळांमध्ये आहे. लॉकडाऊनमुळे वाहन उपलब्ध नसल्याने शाळेत कसे जावे. नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार याबाबत विभागाकडून  स्पष्टता नाही.

- Advertisement -

– राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट

वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे लॉकडाउन असल्याने शाळेतच आहेत. रेडझोन असल्याने मुंबईतील शाळांमधील शिक्षकांना शाळेत पोहचता येत नाही. अनेक शिक्षकांचे १० वी बोर्डाचे पेपर देखील शाळेतच आहेत ते तपासून नियमकांकडे कसे पाठवावे याबाबतचा निर्णय अजूनही बोर्डाने घेतलेला नसल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा व शिक्षकांपुढील अडचणी पाहता निकालपत्र पालकांना देण्याची घाई करू नये.
– अनिल बोरनारे, संयोजक, भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभाग

शाळांना लाॅकडाऊनमधून कोणतीही सूट नाही. सर्व रेकाॅर्ड शाळांमध्ये आहे. निकाल कसा तयार करायचा? शिवाय शिक्षकांना उन्हाळी सुट्टी आहे की नाही? याबाबत अजून कोणतीही भूमिका स्पष्ट नाही. दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेत तपासणी करिता पडून आहेत. त्याबाबत लाॅकडाऊननंतर निर्णय व आता रिझल्ट बनवायचा कसा व कोठून? आम्ही प्रथमपासूनच मागणी करीत होतो की लाॅकडाऊन मधून काही शिक्षकांना वगळा, पण त्यावर मार्ग काढला नाही तसेच आता रेकार्ड आणायला बाहेर काढून पोलिसांकडून बदडायला शिक्षकांना सोडायचे का? अनेक शाळांमध्ये ऑनलाईन सुविधा नाहीत, त्या शासनाकडून पुरविण्यात याव्यात. आदेश वस्तुस्थिती साक्षेप नसल्याने याबाबत योग्य ते सहकार्य मिळणे कठीण आहे.

– प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

एक प्रतिक्रिया

  1. जर शासनाने सांगितले आहे, सर्वजण पास परीक्षा नाहीत, आकारिक मूल्यमापन यावरून गुण द्या तर निकाल लागलेला आहेच. त्यासाठी निकाल जाहीर करण्याची गाही का

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -