मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पावसाने सुरुवात केली. हवामान खात्याकडून मुंबईत आज रेड अलर्ट ( Red Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याल देखील आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसह कोकणात ९ जून ते १२ जूनपर्यंत अतिवृषष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईत सुरु झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुंबईत पहिल्याच पावसात मुंबईकरांचे अतोनात हाल झाले तर पुढील पावसाच्या मोसमात मुंबईकरांचे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
IMD issues red alert in Mumbai, Palghar & Thane districts for today and orange alert for the next four days pic.twitter.com/wG8uz5XdNT
— ANI (@ANI) June 9, 2021
मुंबईसह कोंकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही नुकताच पाऊस सुरु झाला आहे तर काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीच्या काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याचे वैज्ञानिक,प्रादेशिक हवामान केंद्राच्या मुंबईंच्या शुभांगी भुते यांनी सांगितले आहे. कोकण किनारपट्टीप्रमाणे मुंबई,ठाणे आणि पालघरमध्येही पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण पाच दिवस मुंबई,ठाणे,पालघर आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महापालिकेने केलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यात आली आहे. मुंबईतील हिंदमाता,कुर्ला,माटुंगा,किंग सर्कल,दादर,परळ, सायन,अंधेरी भागात मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबईतील अनेक ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली.
हेही वाचा – Photo: पहिल्याचं पावसात मुंबईची तुंबई, वाहतूक विस्कळीत