मुंबईच्या कुर्ला परिसरात घडलेल्या घटनेला भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. मंगळवारी एका अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. या घटनेत पाच पोलीस जखमी झाले असून त्यापैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते, असे नवाब मलिक यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात पद्धतशीरपणे लोकांना चिथावणी दिली जात होती. भाजपचे स्थानिक नेते हे राजकीय फायद्यासाठी लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. त्यामुळे आजचा प्रसंग घडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
कुर्ला येथे राहणाऱ्या पांचाराम रिठाडिया यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नसल्याने पांचाराम रिठाडिया यांनी आत्महत्या केली होती. आज त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला हजारो लोकांची गर्दी जमली होती. त्यावेळी जमाव संतप्त झाला आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली, असेही नवाब मलिक म्हणाले.
वाचा – चेंबुरमध्ये रास्ता रोको आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक