घरमुंबईभयंकर! मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समधून सहा मृतदेह गायब

भयंकर! मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्समधून सहा मृतदेह गायब

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असून त्यातून अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईतील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून करोनाबाधितांचे सहा मृतदेह गायब झाले आहेत, असा आरोप भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे.

डॉ. किरीट सोमय्या यांनी एक सविस्तर ट्विट करून गायब झालेल्या मृतदेहांची नावासह माहिती दिली आहे. तसेच, हे मृतदेह कोणत्या हॉस्पिटलमधून गायब झाले याचीही माहिती दिली आहे. या तपशिलासह सोमय्या यांनी मंगळवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यांचे मृतदेह रुग्णालयातून गायब होत आहेत, त्यांच्या कुटुंबीयांच्या मन:स्थितीचा विचार करून सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

सोमय्या यांनी पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, केईएम रुग्णालयातून सुधाकर खाडे यांचा मृतदेह गायब झाला होता. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयातून मेहराज शेख यांचा तर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून विठ्ठल मोरे यांचा मृतदेह गायब झाला होता. तो आज बोरीवली रेल्वे स्थानकावर सापडला. नायर रुग्णालयातून मधुकर पवार यांचा तर जोगेश्वरी ट्रॉमा हॉस्पिटलमधून राकेश शर्मा यांचा मृतदेह गायब झाला होता. तर, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाने ग्यांतीदेवी विश्वकर्मा यांचा मृतदेह कुटुंबियांकडे देण्याच्या आधीच त्यावर अंत्यसंस्कार केले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ‘हे काय चालले आहे,’ असा प्रश्नही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला केला आहे.

महाराष्ट्राला पडलेला करोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असून बाधितांची संख्या ८८ हजारांच्याही पुढे गेली आहे. आतापर्यंत ४० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बरे होणार्‍यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता वाढत आहे.

- Advertisement -

मृतदेह गायब नाहीत तर नियमानुसार कार्यवाही
जे ६ मृतदेह गायब झाल्याचा दावा करण्यात येत आहे, ते मृतदेह गायब झालेले नाहीत. त्या प्रत्येक प्रकरणात प्रशासनाने वेळोवेळी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. प्रामुख्याने मृत रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क होत नसल्यामुळे किंवा उशिरा संपर्क झाल्यामुळे अशा घटना घडल्या असल्या, तरी प्रशासनाने त्याचे कधीही समर्थन केलेले नाही. दावा करण्यात आलेल्या ६ मृतदेहांपैकी ५ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या नातेवाईकांना त्याची माहिती देण्यात आली आहे किंवा कोविड मार्गदर्शक तत्वांनुसार पोलीस प्रशासनासमवेत त्यावर योग्य ती कार्यवाही देखील करण्यात आली. शेवटच्या राजावाडी रुग्णालयातल्या मृतदेहाबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याचाही खुलासा स्वतंत्रपणे करण्यात येईल’, असे पालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -