घरमुंबईछोट्या घटकपक्षाच्या नाराजीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली

छोट्या घटकपक्षाच्या नाराजीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली

Subscribe

गेले चार साडेचार वर्ष सुरू असलेल्या नाराजीनाट्यानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युती झाली खरी पण आता या युतीमुळे भाजपासोबत असलेल्या छोट्या घटकपक्षांची कशी समजूत काढायची असा प्रश्न आता मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेडसावू लागला आहे. लोकसभेसाठी भाजपाने शिवसेनेला 23 तर स्वतःला 25 जागा घेतल्याने घटक पक्षाना काय द्यायचे अशी डोकेदुखी भाजपाची वाढली आहे. त्यातच भाजपा सोबत असलेल्या घटकपक्षांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने भाजपाची डोकेदुखी अधिकच वाढू लागली आहे.

सर्व छोट्या घटकपक्षाना हव्यात लोकसभेसाठी जागा –
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भाजपासोबत असलेल्या पाचही घटक पक्षांनी लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून,महादेव जानकर यांनी तर सहा जागा मागितल्या आहेत. मात्र त्यांना बारामती ही एक जागा भाजपा सोडण्यासाठी तयार आहे. तर रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र युती झाल्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेला सोडला जाऊ शकतो त्यामुळे सदा भाऊंची नाराजी दूर कशी करायची हा देखील प्रश्न आहे. एकीकडे विनायक मेटे, रामदास आठवले, सदाभाऊ खोत आणि जानकर यांनी इच्छा व्यक्त केलेली असताना दुसरीकडे जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे हे देखील इकचुक आहेत मात्र त्यांना भाजपा विधानसभेसाठी जागा देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपा फक्त दोन जागा मित्रपक्षांना सोडणार –
आपलं महानगरला विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा फक्त आठवले आणि जानकर यांच्यासाठी एक-एक जागा सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाकीच्याचे काय हा प्रश्न महत्वाचा आहे. आधीच सत्तेत असूनही मंत्री पदापासून दूर राहिल्यामुळे शिवसंग्रामचे विनायक मेटे नाराज आहेत. त्यातच आता लोकसभेसाठी मिळणारी जागा ही मिळणे कठीण आहे. त्यामुळे नाराज मेटेना समजवायचे कसे असा भाजपा समोर पेच निर्माण झाला आहे. युती झाल्यामुळे हातकंनगले हा मतदार संघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असल्याने रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे नाराज असल्याची माहिती मिळत आहेत. तर विनायक मेटे देखील युतीशी चर्चा करताना मिञपक्षांना विचारात न घेतल्यामुळे नाराज आहेत. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील आपली नाराजी जाहीर पणे व्यक्त करत भाजपाने आपल्यासाठी एकतरी जागा सोडावी असा सूर लावला आहे.

भाजपाकडे उरणार फक्त 23 जागा –
युतीमध्ये शिवसेना 23 तर भाजपा 25 अशा जागा वाटून घेण्यात आल्या आहेत. त्यातील भाजपाला मिळालेल्या 25 जागांपैकी एक जागा आठवले आणि एक जागा जानकर यांना सोडली तर भाजपाकडे 23 जागा उरणार आहेत.

- Advertisement -

भाजपने युती करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अवहेलना केली आहे. एका अर्थाने अन्याय आहे. लोकसभेची दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती, मात्र ती शिवसेनेच्या कोटयात असल्यामुळे ती मिळणार नाही, असे वाटते आहे. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला दिलेल्या आठही जागा युतीमधील शिवसेनेच्या वाटयात आहेत, त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे.
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

मी मागील तीन वर्षांपासून हातकणंगले काम करत आहेत. सरकारचे कार्यक्रम मी संपूर्ण तालुक्यामध्ये राबवले. त्यामुळे भाजपाने ही जागा आपल्यासाठी सोडावी.
सदाभाऊ खोत, कृषीराज्य मंत्री

आम्ही भाजपाकडे विदर्भ आणि मराठवाडा या दोन जागा मागितल्या आहेत. आम्ही मुख्यमंत्री आम्हाला कधी चर्चेसाठी बोलावत आहेत याची बात बघत आहोत .
विनायक मेटे, शिवसंग्राम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -