मुंबईत (Mumbai) शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) मुंबईच्या अनेक सखल भागांत पावसाचे पाणी साचले आहे. अशातच पुढील पाच दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Yellow alert in mumbai for next five days)
मुंबईसह पालघर, ठाणे, कोल्हापूरपर्यंत पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस कोसळत आहे.
पहिल्या दिवशी मुंबईतील नेहमीच्या ठिकाणी पाणी साचले होते. हिंदमाता चौक, अंधेरी, गांधी मार्केट आदी भागात पाणी साचले असून, रात्री उशिरा या पाण्याचा निचरा झाला. परंतु, आज पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळए मुंबईकरांनी अवशक्यता असल्यास घराबाहेर पडा, असे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मागील २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक मुंबईत १२६ मि.मी., तर रत्नागिरीत ८३ मि.मी. पाऊस झाला. सांताक्रूझ, अलिबाग येथे ५३ मि.मी. तर डहाणूत २१ मि.मी. पाऊस झाला.
विदर्भातील अमरावतीत १५, वर्धा १४, बुलडाणा ६, नागपूर ४, ब्रह्मपुरी, चंद्रपूर १ तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये ९, महाबळेश्वर ८, सांगली ५ मि.मी. पाऊस पडला. कोकण वगळता उर्वरित भागात येत्या चार दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक होत आहे. यामध्ये अधिकाऱ्यांना खबरदारीचे आदेश देण्यात येणार आहे.
हेही वाचा – …आणि फडणवीस ढसा ढसा रडले, पक्षाचा आदेश मानत उपमुख्यमंत्री बनले