बोईसर : मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अनधिकृत बांधकामे महसूल विभागाने जमीनदोस्त केली आहेत. आदिवासी जागांवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे उभारलेल्या बांधकामांवर केलेल्या धडक कारवाईने भूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्हार गावाच्या हद्दीत गट क्र.२ आणि १५/४ या आदीवासींना शेती करण्यासाठी वाटप केलेल्या जागांवर नालासोपारा येथील काही परप्रांतीयांनी बेकायदेशीरपणे दगडी पायांचे बांधकाम व मातीचा भराव करून त्यावर पत्र्याच्या शेड उभारल्या होत्या. या विरोधात पालघर महसूल विभागाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी मनीष वर्तक आणि तलाठी संजय चुरी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याच्या शेड जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली.
पालघर जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला चारोटी ते ढेकाळे या पट्ट्यात आदिवासी आणि वनविभागाच्या जागांवर अतिक्रमण करून परप्रांतीयांनी अनेक बेकायदा हॉटेल्स आणि धाबे बांधले आहेत. महामार्गावरील काही हॉटेल्स आणि ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून भोळ्या भाबड्या आदीवासींना आमिषे दाखवत जमिनी बळकावण्यासाठी भूमाफीया आणि दलालांच्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत.त्याचबरोबर हायवे शेजारील वनविभागाच्या जमिनींवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले हे अतिक्रमण हटवून जागा मोकळी करण्यासाठी पालघर महसूल विभाग आणि वनविभागाने संयुक्तरित्या कारवाई करण्याची मागणी होत आहे.