खोपोली: teaमुंबई पुणे द्रूतगती मार्गावर खंडाळा घाटातील उतारावर खोपोलीनजिक गुरुवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एका एर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने एक महिला या अपघातातून वाचली आहे.
याबाबत पोललिंनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याकडून मुंबईकडे जाणारी एर्टिगा कार (एमएच१४ इसी ३५०१) मध्ये चालकाच्या व्यतिरिक्त आठ प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणहून मुंबईकडे जाण्यासाठी कारमधून प्रवास करत होते. सदर कार मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील ढेकू गाव हद्दीत आली असता चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की त्यामध्ये प्रवास करणार्या या अब्दुल रहमान खान (३२, घाटकोपर), अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी (राजापूर, जिल्हा रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (३०,कामोठे, नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (२३ म्हातारपाडा, मुंबई), अमिरुऊल्ला चौधरी हे मयत झाले असून चालक मच्छिंद्र आंबोरे (३८), दिपक खैराल हे जखमी झाले आहेत. अस्फीया रईस चौधरी (२५, कुर्ला, मुंबई) ह्या सुखरुपपणे बचावल्या आहेत. सहा जणांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला किरकोळ जखमी झाली असून चार जणांना गंभीर इजा झाल्याने कामोठेतील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यादरम्यान त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चालक आणि एक प्रवासी वर उपचार सुरू आहेत.
आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असून अपघातस्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले आदींनी भेटी देत या अपघात प्रकरणी तपास सुरू केला आहे.