करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळही बंद आहेत. करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर भारत २०३२ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी आपली दावेदारी सांगेल, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी दिली. भारताने दहा वर्षांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवले होते. त्यावेळी आम्हाला चांगलाच धडा मिळाला होता, पण तरीही आम्ही मागे हटणार नाही असे बात्रा यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही नक्कीच २०२६ युवा ऑलिम्पिक आणि २०३२ ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहोत. भारतामध्ये ऑलिम्पिक किंवा इतरही मोठ्या स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करण्याची क्षमता आहे, असे बात्रा यांनी सांगितले. भारताने याआधीच २०२६ ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्यात रस असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) लिखित स्वरुपात पाठवले आहे. मात्र, त्यांना थायलंड, रशिया आणि कोलंबियाचे आव्हान आहे.
२०३२ ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताने कागदपत्रे एकत्र करण्यास सुरुवात केली होती. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे काम थांबवावे लागले. २०३२ ऑलिम्पिकचे यजमानपद कोण भूषवणार याचा निर्णय २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.