इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने त्याच्या पुस्तकात एकदिवसीय विश्वचषकमध्ये टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध जाणूनबूजून हरली, असा दावा केला आहे. स्टोक्सच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. बेन स्टोक्सने ‘ऑन फायर’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात स्टोक्सने टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध जाणूनबूजून हरल्याचा दावा केला आहे, असं पाकिस्तानचे माजी गोलंदाज सिकंदर बख्त यांनी म्हटलं आहे. “स्टोक्सने असं लिहिलं आहे की, भारतीय संघ जाणूनबूजून इंग्लंडविरुद्ध हरला, ज्यामुळे पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल, ” असा दावा सिकंदर बख्त यांनी केला आहे.
बेन स्टोक्सच्या दाव्याने वादळ
बेन स्टोक्सने आपल्या नवीन पुस्तक ‘ऑन फायर’ मध्ये भारताविरुद्ध वर्ल्ड कप २०१९ च्या सामन्याचा उल्लेख केला आहे. बेन स्टोक्सने पुस्तकात म्हटलं आहे की ‘जेव्हा धोनी फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाला ११ षटकांत ११२ धावांची आवश्यकता होती आणि त्याने विचित्र पद्धतीने फलंदाजी केली.’ बेन स्टोक्सच्या म्हणण्यानुसार महेंद्रसिंग धोनीने त्या सामन्यात विजयासाठीची भावना दाखवली नाही. इतकेच नव्हे तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची भागीदारी देखील ‘गूढ रहस्य’ असल्याचं स्टोक्सने सांगितलं. मात्र, बेन स्टोक्सने हा दावा फेटाळला होता.
भारताच्या पराभवामुळे चाहते नाराज
२०१९ च्या विश्वचषकात इंग्लंडने भारतासमोर ३३८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण टीम इंडियाला निर्धारित षटकांत केवळ ५ गड्यांच्या मोबदल्यात ३०६ धावांवरच मजल मारता आली आणि हा सामना ३१ धावांनी गमावला. भारताच्या या पराभवामुळे चाहते नाराज झाले. त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव नाबाद परतले.