इंग्लंड दौऱ्यातील वन डे मालिकेचा दुसरा सामना भारताने गमावला असून इंग्लंडच्या संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने ३२३ धावांचे आव्हान दिले होते मात्र भारताचा डाव ५० ओव्हरमध्ये सर्वगडी बाद २३६ रनावर आटोपला. त्यामुळे तब्बल ८६ धावांनी इंग्लंडने दणदणीत विजय मिळवला. ११६ बॉलमध्ये ११३ धावा ठोकणारा जो रुटला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
भारतानं आपला डाव सावध सुरु केला. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवननं ५२ रन्सची भागीदारी केली. रोहित शर्मा अतिशय सावध खेळत होता. मात्र मार्कवूडनं रोहित शर्माला बोल्ड केलं. तर शिखर धवनचा स्टोक्सनं कॅच घेतला. लोकेश राहुलला भोपाळादेखील फोडता आला नाही.
३२३ धावांचं भारताला आव्हान
लॉर्ड्सवर इंग्लंडनं भारताला ३२३ धावांचं आव्हान दिलं आहे. लंडनमध्ये चालू असलेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये इयान मॉर्गननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. मात्र, त्याचा विश्वास सार्थ ठरवत इंग्लंडच्या टीमनं ३२२ धावांचा डोंगर उभारला आहे. या मैदानावर टॉस जिंकणाऱ्या प्रत्येक टीमनं आतापर्यंत पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इयान मॉर्गननं पहिल्यांदाच असा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केलं होतं.
रूटनं लढवला किल्ला
जो रूटनं ११६ बॉल्सचा सामना करत ११३ रन्स काढल्या. यामध्ये ८ फोर्स आणि १ सिक्सचा समावेश आहे. ४५ व्या ओव्हरपर्यंत रूटनं डेव्हिड विलीच्या साथीनं किल्ला लढवत २६४ रन्सचा टप्पा पार करून दिला. दरम्यान या मॅचमध्येही कुलदीप यादवनं ३ विकेट्स काढल्या आहेत. सातव्या विकेटसाठी ८३ रन्सची झुंज जो रूट आणि डेव्हिड विलीनं दिली. जो रूट नाबाद राहिला असून भारताला विजयासाठी ३२३ धावांचं आव्हान इंग्लंडकडून देण्यात आलं आहे.