मुंबईकर यशस्वी जयस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना यांची पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. प्रियम गर्ग या संघाचे नेतृत्व करणार आहे. १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. गतविजेत्या भारताने ही स्पर्धा आतापर्यंत चार वेळा (२००२, २००८, २०१२, २०१८) जिंकली आहे. पुढील वर्षीच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघही आहेत.
Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad. Priyam Garg to lead the side. pic.twitter.com/VEIPxe2a2n
— BCCI (@BCCI) December 2, 2019
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये भारताच्या फलंदाजीची भिस्त डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या खांद्यावर असेल. यशस्वीने नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या ६ सामन्यांत ५६४ धावा केल्या होत्या. यात एका द्विशतकाचा समावेश होता. दुसरीकडे डावखुरा फिरकीपटू अथर्वने भारताला १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला होता.