भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाने आयपीएल स्पर्धेच्या बायो-बबलमध्येही शिरकाव केला. काही खेळाडू, सपोर्ट स्टाफ सदस्य आणि ग्राऊंड स्टाफला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे बीसीसीआयने यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची असून त्यांच्या जीवाशी आम्ही खेळू शकत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला आयपीएल स्थगित करणे हाच योग्य निर्णय असल्याचे आम्हाला वाटले, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले. यंदा आयपीएलचे ६० पैकी २९ सामनेच होऊ शकले.
सुरक्षितता सर्वात महत्वाची
बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मिळून यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी खेळाडू, या स्पर्धेची जोडले गेलेले लोक, आमचे कर्मचारी, ग्राऊंड स्टाफ आणि पंच यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. आम्ही त्यांच्या जीवाशी खेळू शकत नाही, असे जय शाह म्हणाले.
आणखी दोन खेळाडूंना कोरोना
सोमवारी वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या कोलकाता नाईट रायडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर मंगळवारी सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा लेगस्पिनर अमित मिश्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बीसीसीआय आणि गव्हर्निंग कौन्सिलला मिळून यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले.
UPDATE: The Indian Premier League Governing Council (IPL GC) and Board of Control for Cricket in India (BCCI) in an emergency meeting has unanimously decided to postpone IPL 2021 season with immediate effect.
Details – https://t.co/OgYXPj9FQy pic.twitter.com/lYmjBId8gL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2021