इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सामना रंगणार आहे. हा सामना बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीसाठी नेहमीच खास असतो. कोहली मूळचा दिल्लीचा असून या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतो. यंदा बंगळुरू आणि दिल्ली या दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला आहे. या दोन्ही संघांना आतापर्यंत पाच पैकी चार सामने जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे आजच्या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बंगळुरूने यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला सलग चार सामने जिंकले. मात्र, मागील सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केले. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे दमदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य असेल.
फलंदाज ठरले अपयशी
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात रविंद्र जाडेजाच्या अष्टपैलू खेळामुळे बंगळुरूला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला होता. परंतु, त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. बंगळुरूचा संघ या सामन्यात केवळ चार फलंदाजांसह खेळला. त्यामुळे आजच्या सामन्यात आणखी एका फलंदाजांना संघात घेण्याचा बंगळुरू विचार करू शकेल.
ललित यादवचे पुनरागमन?
दुसरीकडे दिल्लीने आपल्या मागील सामन्यात सनरायजर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. मात्र, त्या सामन्यात चार षटकांत केवळ २७ धावा देणारा अश्विन उर्वरित आयपीएल मोसमात खेळणार नाही. त्यामुळे दिल्लीला त्याची जागा घेऊ शकेल असा गोलंदाज शोधावा लागणार आहे. अश्विनच्या अनुपस्थितीत ललित यादवचे संघात पुनरागमन होऊ शकेल. अक्षर पटेल आणि अमित मिश्राच्या साथीने ललित चांगली कामगिरी करेल अशी दिल्लीला आशा असेल.