मुंबई इंडियन्सने गुरुवारी (आज) दुपारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला ७ विकेट राखून पराभूत केले. गतविजेत्या मुंबईला यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात करता आली नाही. त्यांना पहिल्या पाच पैकी केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले होते. हे पाचही सामने चेन्नईत झाले होते. मात्र, मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर झाला व या सामन्यात मुंबईने अप्रतिम खेळ केला. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दिल्लीच्या खेळपट्टीचे कौतुक करताना चेन्नईच्या खेळपट्ट्यांना टोला लगावला. आमचे सर्व खेळाडू दिल्लीमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होते. कारण, इथल्या खेळपट्ट्या चेन्नईसारख्या नसणार हे आम्हाला ठाऊक होते, असे रोहित म्हणाला.
राजस्थानविरुद्धचा विजय महत्वाचा
सलग दोन पराभवांनंतर आमच्यासाठी हा विजय खूप महत्वाचा होता. आम्ही या सामन्यात अगदी पहिल्या चेंडूपासून सर्वोत्तम खेळ केला. सर्वच खेळाडू जबाबदारीने खेळले. आमच्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली. अखेरच्या सात षटकांत आम्ही राजस्थानला केवळ ५० धावाच करू दिल्या. चेन्नईच्या खेळपट्ट्या फारशा चांगल्या नव्हत्या आणि आम्हाला त्या खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यात अपयश आले होते. परंतु, दिल्लीच्या खेळपट्ट्यांची गोष्ट वेगळी आहे, असे राजस्थानवरील विजयानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
मुंबईची राजस्थानवर मात
मुंबईने राजस्थानवर ७ विकेट राखून मात केली. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती. मुंबईने १७२ धावांचे लक्ष्य ७ विकेट आणि ९ चेंडू राखून गाठले. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने ५० चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. त्याला कृणाल पांड्याने ३९ धावा करत चांगली साथ दिली.