नवी दिल्ली : IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आयपीएलमधील पहिल्या दोन हंगामांच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा गुजरात हा पहिला संघ ठरला असला तरी त्यांचा सामना तब्बल दहा वेळा अंतिम सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. परंतु गुजरात संघाने गेल्या वर्षीचा फॉर्म कायम राखत या वर्षीही खेळाची सुरुवात करताना लीग सामन्यातील 14 पैकी 10 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पहिले स्थान पटकावत दणक्यात एन्ट्री केली होती. त्यामुळे गेल्या दोन हंगामात सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरातने 32 पैकी 23 लीग सामने जिंकले. त्यामुळे गुजरातची विजयी टक्केवारी 71 टक्के असल्यामुळे चेन्नईपेक्षा गुजरात संघाचे पारडे जड असताना दिसत आहे. (statistics say Gujarat Titans win ipl 2023 trophy)
यशस्वी कर्णधार
मुंबई इंडियन्सने सोडल्यानंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सशी जोडला गेला. त्याच्याकडे गुजरात संघाचे कर्णधारपद देण्यात आले. यावेळी त्याने चांगली कामगिरी करताना कर्णधार म्हणून 30 पैकी 22 सामने जिंकले आहेत. 2022 पासून आयपीएलमधील एकाही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्या गेल्या दोन हंगामातील यशस्वी कर्णधार आहे.
अष्टपैलू कर्णधाराची भूमिका चोख बजावली
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार असला तरी तो फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करतो. त्याने दोन्ही हंगामात अष्टपैलू कामगिरी करताना दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आणि त्याच्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकटे घेणारा गोलंदाज आहे. हार्दिकने गुजरातकडून खेळताना दोन्ही हंगामात 812 धावा केल्या आहेत, तर 11 विकेट घेतल्या आहेत. इतर कर्णधारांवर नजर टाकली तर काही विकेटकिपर फलंदाज आहेत, तर काही फक्त फलंदाज आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या अष्टपैलू कर्णधार म्हणून आपली भूमिका चोख बजावताना दिसतो आहे.
चुका स्विकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो
हार्दिक पांड्या गेल्या दोन हंगामात सर्वोत्तम कर्णधार म्हणून उदयास येताना दिसत असला तरी काही आघाड्यांवर कर्णधार म्हणून त्याचा राग अनावर होताना दिसला. गेल्या हंगामाच्या सुरुवातीला तो खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल त्यांना फटकारतानाही दिसला होता. मोहम्मद शमीच्या खराब क्षेत्ररक्षणावर पांड्याचा राग चर्चेत आला होता. पण त्यानंतर त्याने स्वत:वर बरेच काम केले. तेव्हापासून तो आता आयपीएलमधील एक बिनधास्त कर्णधारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सामन्यातील कोणताही निर्णय चुकीचा ठरला तर तो जाहीरपणे स्वीकारताना दिसतो आणि येणाऱ्या सामन्यांमध्ये त्याची पुनरावृत्ती करताना दिसत नाही.
गेल्या हंगामापासून सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणारा संघ
गुजरात टायटन्स संघाने दोन्ही हंगामात आतापर्यंत 31 पैकी 23 सामने जिंकले आहेत, तर त्यांना 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील दोन हंगामाबद्दल बोलायचे तर गुजरात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ आहे. यानंतर राजस्थान रॉयल्सने 31 पैकी 17 सामने जिंकले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स संघाने 30 पैकी 17 सामने जिंकत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या दोन हंगामात गुजरात संघाच्या विजय/पराभवाच्या रनरेटवर नजर टाकील तर गुजरात 2.555 रनरेटमुळे पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर लखनऊ सुपर जायंट्स 1.416 रनरेटसह दुसऱ्या क्रमांकावर मोठी आघाडी सिद्ध करताना दिसतो आहे. गुजरातने दोन्ही हंगामात 5213 धावा केल्या आहेत. यानंतर राजस्थान संघाने ५०९४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक विकेटबद्दल बोलायचे तर गुजरात संघाने दोन्ही हंगामात 203 विकेट्स घेतल्या आहेत, तर यानंतर लखनऊ संघ 181 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.