महाराष्ट्रने ५-५ चढायांच्या लढतीत यजमान उत्तर प्रदेशला ३८-३७ (७-६) असे पराभूत करत ‘६८व्या सिनियर पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी’ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत सेनादलाशी, तर गतविजेत्या रेल्वेची लढत राजस्थानशी होईल. अयोध्या येथील डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात मॅटवर झालेल्या या सामन्यात नियमित वेळेअंती ३१-३१ अशी बरोबरी होती. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी ५-५ चढायांचा डाव खेळवण्यात आला. या डावात महाराष्ट्राने एक बदल केला. चढाईच्या निलेश साळुंखेला संधी देण्यात आली. त्याने या संधीचे सोने करताना या डावातील आपल्या चढाईत बोनस व गडी टिपत २ गुण घेतले. त्यानंतर गिरीश इरनाकने राहुल चौधरीची पकड केली. महाराष्ट्राने अखेर ही लढत ३७-३७ अशी अवघ्या एका गुणाच्या फरकाने जिंकली.
त्याआधी नियमित सामन्यात सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या अमीर कदमने प्रो-कबड्डी स्टार राहुल चौधरीची पहिल्याच चढाईत पकड करत गुणांचे खाते उघडले. त्याला उत्तर देत युपीने रिशांकची पकड करत बरोबरी साधली. यानंतर युपीने अधिक आक्रमक खेळ करत १२ व्या मिनिटाला महाराष्ट्रावर लोण देत ११-५ अशी आघाडी घेतली. त्यातच पंकज मोहिते जायबंदी झाल्यामुळे तो उर्वरित सामन्यात खेळू शकला नाही. युपीवर होणारा लोण महाराष्ट्राने आपल्यावर ओढवून घेतला. या पूर्वार्धातील २ लोणमुळे युपीने २२-१४ अशी आघाडी घेतली. मध्यंतरालाच युपीकडे २२-१६ अशी आघाडी होती.
उत्तरार्धात मात्र महाराष्ट्राने खेळात सुधारणा केली. जायबंदी पंकजच्या जागी अजिंक्य पवारला संधी मिळाली. त्याने आणि सिद्धार्थ देसाईने चढाईत, तर गिरीश इरनाक, मयूर कदम यांनी पकडीत गुण घेत युपीवर पहिला लोण देत २४- २४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या चढाईचा खेळ सुरू झाला. त्यामुळे शेवटी ३१-३१ या समान गुणफलकावर संपूर्ण डाव संपला. त्यामुळे ५-५चढायांचा डाव झाला, ज्यात महाराष्ट्राने बाजी मारली.