आयपीएल २०२३ च्या १६व्या हंगामाला आजपासून सुरूवात झाली आहे. भारतात आयपीएल स्पर्धेला सुरूवात झाली असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पाकच्या खेळाडूंना यंदाच्या वर्षातही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे माजी पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर टीका केली आहे. बीसीसीआयला आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळवायचे नसेल तर ही मोठी बाब नाही. कारण पाकिस्तानकडे शानदार खेळाडूंचा साठा आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. याव्यतिरिक्त बीसीसीआय गर्विष्ठ बोर्ड असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्यानुसार, इम्रान खान यांनी टाइम्स रेडिओशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली नसली तरी पाकिस्तानी खेळाडूंनी याबाबत चिंता करू नये. कारण आपल्याकडे चांगल्या खेळाडूंची संख्या सर्वााधिक आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुर्दैवी बाब आहे. भारत क्रिकेटच्या क्षेत्रात महाशक्ती बनला आहे. ते ज्याप्रकारे आमच्याशी व्यवहार करतात. त्यात गर्विष्ठपणा असल्याची टीका इम्रान खान यांनी केली आहे.
विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने मांडली भूमिका
आशिया चषकाच्या यजमानपदावरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद सुरू आहेत. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, आशिया चषक २०२३ची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले आहे.
पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी आम्ही भारतात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने आपली भूमिका मांडत आणि पर्याय सूचवत बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : विश्वचषकाच्या सामन्यांबाबत पाकिस्तानने मांडली भूमिका, पर्याय सूचवत BCCIवर साधला निशाणा