श्रीलंकेच्या क्रिकेट संघासाठी मागील काही वर्षे खूप अवघड गेली आहेत. महेला जयवर्धने, कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन आणि लसिथ मलिंगा यांसारख्या महान क्रिकेटपटूंच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा घेऊ शकतील असे खेळाडू श्रीलंकेला मिळालेले नाही. त्यामुळे श्रीलंकन संघाला फारसे यश मिळवता आलेले नाही. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेने तब्बल नऊ कर्णधार निवडले आहेत. श्रीलंकन क्रिकेटच्या अडचणीत आता आणखीच वाढ होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे, श्रीलंकेच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंनी आपल्या क्रिकेट बोर्डाविरुद्ध बंड पुकारले आहे. श्रीलंकन बोर्डाने खेळाडूंचे वेतन ठरवण्यासाठी नवी प्रक्रिया तयार केली आहे. परंतु, यात पारदर्शकता नसल्याचे म्हणत श्रीलंकन खेळाडूंनी आपल्याच बोर्डाला निवृत्त होण्याची धमकी दिली आहे.
चार मुद्द्यांच्या आधारे गुण
श्रीलंकन क्रिकेटपटूंना चार मुद्द्यांच्या आधारे गुण दिले जाणार असून त्यानुसार त्यांचे वार्षिक वेतन निश्चित होणार आहे. खेळाडूंची फिटनेस, शिस्त, मागील काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी, तसेच नेतृत्व गुण या चार मुद्द्यांच्या आधारे खेळाडूंना गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर खेळाडूंना चार गटांमध्ये विभागले जाणार आहे. मात्र, श्रीलंकन बोर्ड याबाबतची माहिती केवळ आपल्याकडेच ठेवणार असल्याने खेळाडूंनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.
प्रक्रियेत पारदर्शकता राखणे गरजेचे
श्रीलंकन बोर्डाच्या या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. आपल्याला कशाच्या आधारे, किती गुणांसह कोणत्या गटात ठेवण्यात आले आहे, हे खेळाडूंना कळायला हवे, असे खेळाडूंचे प्रतिनिधी निशान प्रेमथीरत्ने यांनी नमूद केले आहे. तसेच श्रीलंकन बोर्डाने खेळाडूंना विश्वासात घेऊन प्रक्रियेत पारदर्शकता राखणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.