पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी झाला. या सामन्यात पाकिस्तानने २८ धावांची विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांची ही मालिका २-१ अशी खिशात घातली. ही मालिका जिंकल्याबद्दल माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन केले. मात्र, त्याचवेळी आफ्रिदीने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला खडे बोलही सुनावले. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाच्या उद्यापासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होता यावे म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या बऱ्याच प्रमुख खेळाडूंनी अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका बोर्डानेही खेळाडूंना हा सामना मुकण्याची परवानगी दिली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएल स्पर्धेला अधिक महत्व दिले जाणे आफ्रिदीला आवडले नाही.
हे पाहून वाईट वाटते
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत भाग घेण्यासाठी ही मालिका अर्ध्यातच सोडण्याची परवानगी दिली हे पाहून आश्चर्य वाटले. टी-२० स्पर्धांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा अधिक महत्व दिले जात असल्याचे पाहून वाईट वाटते. याबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असे आफ्रिदी त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्खिया यांसारखे दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख खेळाडू खेळले नाहीत.
Surprising to see @OfficialCSA allowing players to travel for IPL in the middle of a series. It is sad to see T20 leagues influencing international cricket. Some rethinking needs to be done!! https://t.co/5McUzFuo8R
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 7, 2021
फखर झमानचे शतक
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३२० अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून फखर झमान (१०१) आणि कर्णधार बाबर आझम (९४) यांनी चांगली फलंदाजी केली. ३२१ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २९२ धावांत आटोपला.