आयसीसी टी-२० विश्वचषकात सुपर १२ साठी बुधवारी म्हणजेच आज भारत आणि अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने असणार आहेत. भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. तर अफगाणिस्तान आपल्या स्पर्धेतील तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल. भारताला आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. तर अफगाणिस्तानने ३ सामन्यांत २ विजय मिळवून उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवले आहे. अशातच आजचा सामना दोन्ही संघासाठी विशेषत: भारतीय संघासाठी “करो या मरोचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या संघात बदल करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीसोबतच आपले विश्वचषकातील अस्तित्व कायम राखण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात मोठ्या विजयाची गरज आहे. अशातच कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा सामना एका परिक्षेपेक्षा कमी नाही. भारतीय क्रिकेट निवड समितीकडून ईशान किशनला संघातून बाहेर ठेवून पुन्हा सुर्यकुमार यादवला संधी देण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे यासाठी सुर्यकुमारने फिट होणे गरजेचे आहे. दुसरा बदल म्हणजे भारतीय संघातील फिरकीपटू वरूण चक्रवर्तीच्या जागेवर अनुभवी फिरकीपटू आश्विनला संधी मिळू शकते.
भारताचा आजचा संभावीत संघ
रोहित शर्मा, के.एल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह,
दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघात देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. कारण अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या संघात बदल होण्याची शक्यता आहे. यातच विशेषत: गोलंदाजीत बदल होऊ शकतो.
अफगाणिस्तानचा आजचा संभावीत संघ
हजरतुल्लाह जजई, मोहम्मद शहजाद, रहमानुल्लाह गुरबाज, उस्मान गनी, मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, करीम जनत, राशिद खान, गुलबदीन नईब, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान.