सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर (RCB) मात करत दिल्ली कॅपिटल्सने (DC) प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. यंदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दिल्लीने मोसमाची दमदार सुरुवात केली होती. त्यांना सुरुवातीला नऊ पैकी सात सामने जिंकण्यात यश आले होते. परंतु, त्यानंतर त्यांनी सलग चार सामने गमावले. त्यामुळे हा संघ प्ले-ऑफ गाठण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, त्यांनी आपला अखेरचा साखळी सामना जिंकत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. आता दिल्लीचा गुरुवारी प्ले-ऑफमध्ये मुंबई इंडियन्सशी (MI) सामना होणार आहे. हा सामना जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला विश्वास आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. मात्र, आमचा संघ कोणत्याही संघाला घाबरत नाही. आमच्या संघातही उत्कृष्ट खेळाडू आहेत. सामन्याच्या दिवशी कोणता संघ सर्वोत्तम खेळ करतो हे पाहणे महत्त्वाचे असते. मुंबईच्या संघाला प्ले-ऑफ आणि अंतिम सामन्यांमध्ये खेळण्याचा बराच अनुभव आहे. परंतु, आम्ही मुंबईला नक्कीच पराभूत करू शकतो. मात्र, गुरुवारी होणाऱ्या सामन्यात जो संघ संयम राखले आणि सर्वोत्तम खेळ करेल, तो संघ स्पर्धेत आगेकूच करेल, असे अय्यर म्हणाला.
सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने बंगळुरूला १५२ धावांवर रोखले आणि अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १५३ धावांचे आव्हान १९ षटकांत पूर्ण करत सामना जिंकला. या सामन्याविषयी अय्यरने सांगितले, सलग चार सामने गमावल्यानंतर हा सामना जिंकणे आमच्यासाठी अनिवार्यच होते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. त्यामुळेच आम्ही हा सामना सहजपणे जिंकू शकलो.