अखेरच्या चार षटकांत आमच्या फलंदाजांना रोखणे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांसाठी अवघड असल्याचे मुंबई इंडियन्सचा अनुभवी अष्टपैलू किरॉन पोलार्ड म्हणाला. मुंबई इंडियन्सला किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय मिळवण्यात आले. मुंबईने २० षटकांत ४ बाद १९१ अशी धावसंख्या उभारली. मुंबईच्या सुरुवातीच्या फलंदाजांना वेगाने धावा करण्यात अपयश आले. परंतु, पोलार्ड (२० चेंडूत नाबाद ४७) आणि हार्दिक पांड्या (११ चेंडूत नाबाद ३०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईने अखेरच्या सहा षटकांमध्ये १०८ धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईला विजय मिळवण्यात यश आले.
सर्वोत्तम खेळ केल्याचा आनंद
फलंदाजी करताना तुमच्या समोर सर्व गोष्टी घडत असतात. कोणता गोलंदाज गोलंदाजी करत आहे हे पाहून त्याच्याविरुद्ध कशी फलंदाजी करायची हे ठरवावे लागते. एखाद्या गोलंदाजाच्या षटकात तुम्हाला मोठे फटके मारण्याचा धोका पत्करून १५ धावा कराव्या लागतात. हार्दिकला या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करावी लागली आणि त्याने ती केली. त्याने त्याची ताकद दाखवून दिली. अखेरच्या चार षटकांत आमच्या फलंदाजांना रोखणे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांसाठी अवघड असते, हे आम्हाला ठाऊक आहे. या सामन्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू शकलो याचा आनंद असल्याचे सामन्यानंतर पोलार्ड म्हणाला.
कर्णधार रोहितने केली स्तुती
पोलार्डने मागील दोन सामन्यांत मिळून ४४ चेंडूत १०७ धावा केल्या आहेत. त्यामुळे पोलार्डच्या कामगिरीचे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानेही कौतुक केले. पोलार्डने पुन्हा एकदा उत्कृष्ट फटकेबाजी केली. पोलार्ड आणि हार्दिक यांना अखेरच्या षटकांत वेगाने धावा करण्याचा विश्वास आहे. ते दोघे फॉर्मात असल्याचा आनंद आहे, असे रोहितने सांगितले.