घरठाणेग्रॅण्ड सेंट्रल पार्क आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रॅण्ड सेंट्रल पार्क आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

ठाणे । आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरेल, अशी ग्रॅण्ड सेंट्रल पार्क ही संकल्पना ठाण्यात प्रथमच साकारली आहे. हे उद्यान आबालवृद्धाना आनंद देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यात केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे महापालिकेच्या आणि कल्पतरू समुहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण संपन्न झाले. आमदार संजय केळकर यांनी सुचवल्याप्रमाणे या उद्यानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात येईल. त्यामुळे या उद्यानाची ओळख ‘नमो द ग्रॅण्ड सेंट्रल पार्क’ अशी होईल, असे मुख्यमंत्री महोदयांनी लोकार्पण सोहळ्यात जाहीर केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात कोलशेत भागात 20.5 एकर जागेवर साकारलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कच्या लोकार्पण सोहळ्यास शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, एच. एस. पाटील, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक संजय वाघुले, संदीप लेले, उषा भोईर, भूषण भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिताली संचेती, कल्पतरू डेव्हलपर्सचे मोफतराज मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण उद्यानाची पाहणी केली. त्यातील संकल्पनेवर आधारित विविध देशांची उद्याने, लहान मुलांसाठी असलेली खेळणी, जागा यांची पाहणी केली. क्यू आर कोड स्कॅन करून झाडाविषयी माहिती जाणून घेतली. राज्यातील हे सगळ्यात मोठे उद्यान आहे. सुमारे 3500 झाडे या उद्यानात आहेत. आणखी झाडांचे नियोजन करावे. तसेच, त्याचे व्यवस्थापनही नेटकेपणाने व्हावे. कल्पतरू डेव्हल्पर्सने टीडीआरच्या माध्यमातून हे उभे केले आहे. महापालिकेचा एकही पैसा खर्च न करता हे भव्य दिव्य उद्यान उभे राहिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाण्यात व्हावे स्नो पार्क
ठाण्यात या सेंट्रल पार्क पाठोपाठ एक स्नो पार्क (बर्फ उद्यान) ही विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यात मुख्य रस्ते घेतले आहेत. आता त्यात अंतर्गत रस्तेही घ्यावेत. डेब्रिज, माती पूर्ण काढावी आणि ठाण्यात कुठेही कचरा सापडणार नाही, अशी स्वच्छता करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -