ठाणे आणि मुंबईच्या सीमेवर असलेला जुना कोपरी उड्डाणपूल मंगळवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या उड्डाणपूलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून केले जाणार असून हे जवळपास एक वर्ष सुरू राहणार आहे. याचदरम्यान त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या नव्या ब्रीजवरून दुचाकी आणि थ्री व्हीलरला नो एन्ट्री करण्यात आली असून ही वाहने एक दिशा मार्गने पुढे जाणार आहे. तर ही वाहतुक सुरळीत आणि सुरक्षित राहण्यासाठी मोठी फौज तैनात केली आहे.
पूर्व द्रुतगती महामार्ग हा आठ मार्गिकेचा असला तरी कोपरी रेल्वे उड्डाणपूल हा चार मार्गिकेचा आहे. त्यामुळे कोपरी रेल्वे पूलावर वाहनांचा भार येऊन रोजच्या रोज ठाणेकरांना सकाळी आणि रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. त्यामुळे २०१६ मध्ये हा रेल्वे उड्डाणपूल नव्याने उभारणी आणि रु ंदीकरणाचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) व रेल्वे प्रशासनाने घेतला होता.
या मार्गाच्या उभारणीच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात २४ एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आली. जुन्या पुला लगत ठाण्याच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने नव्या मार्गिका तयार केल्यानंतर मुख्य जुन्या पुलाचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यानुसार नव्या मार्गिका तीन महिन्यापूर्वी खुल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवार दुपारपासून ठाणे वाहतूक शाखेने जुना कोपरी रेल्वे उड्डाणपूल वाहतूकीस बंद केला आहे. एमएमआरडीएकडून या पुलावर भराव टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यानंतर रेल्वेच्या लोखंडी सळई याठिकाणी बसविल्या जाणार आहेत. नव्या मार्गिकेच्या समान ही मार्गिका तयार केली जाणार आहे. पुढील एक ते दिड वर्षे हे काम सुरु राहणार आहे. या कामामुळे शहरात सकाळी ८ ते १० व रात्री ७ ते ११ या कालावधीत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता दाट असल्याने बारा बंगला येथे तात्पुरते दुभाजक बसविले आहेत. हा मार्ग एकदिशा केला आहे. तसेच वाहतुक बदल केल्याने पर्यायी मार्ग ही उपलब्ध करू देण्यात आले आहेत.
वाहतुक सुरळीत आणि सुरक्षिततेसाठी ४० वाहतुक पोलिसांसह १०० वॉर्डनची फौज तैनात केली आहे. हे १०० वॉर्डन नौपाडा, वागळे इस्टेट, वर्तकनगर या युनीट मध्ये तीन शीप मध्ये कार्यरत राहणार आहेत. हे १०० वॉर्डन एमएमआरडीए यांनी दिले असून याच वॉर्डनसाठी हे काम काही महिने लांबणीवर पडेल होते.