घरUncategorizedपतीच्या छळाला वैतागून केली आत्महत्या

पतीच्या छळाला वैतागून केली आत्महत्या

Subscribe

हुंड्यासाठी महिलांचा छळ दिवसेंदिवस वाढत आहे. यासारखी एक घटना खेड तालुक्यात घडली आहे. पतीच्या छळाला वैतागून एका महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

शहरीभागासह ग्रामिण भागातही हुंड्यासाठी महिलांचा छळ होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. खेड तालुक्यातील वाफगावच्या मांदळेवाडी भागात एका विवाहित महिलेचा माहेरून पैसे आणावेत यासाठी उपाशी पोटी ठेवून, शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. या छळाला वैतागून सदर महिलेने आत्महत्या केली आहे. संशयित पती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राजगुरुनगर पोलीसात दाखल झाला आहे. संतोष नाथा मांदळे (मांदळेवाडी, वाफगाव, ता. खेड) असे संशयित पतीचे नाव आहे. तर रुपाली संतोष मांदळे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रुपालीचे वडील वामन नामदेव रोकडे (वाकी खुर्द, ता. खेड) यांनी राजगुरुनगर पोलीसांत फिर्याद दिली आहे.

का केली विवाहितेने आत्महत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी रुपाली हिचे आठ वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील वाफगाव (मांदळेवाडी) येथील संतोष मांदळे याच्याशी विवाह झाला होता. तेव्हापासून तो रूपालीला वडिलांच्या वाटणीची जमीन विकून १२ लाख रुपये दे, नाहीतर घरात राहू नको, असे म्हणून वारंवार मारहाण करीत होता. तसेच उपाशीपोटी ठेवून तिचा छळ करीत होता. शिवीगाळी करून धमकावत होता. शेवटी १९ जुलै रोजी त्याने दारू पिऊन पत्नी रुपालीला मारहाण करुन त्यांच्या दोन मुलांसह वाकी येथे माहेरी वडिलांकडे सोडून निघून गेला. त्यानंतर २६ जुलै रोजी त्याने पत्नीला फोन करून ‘आताच्या आता घरी निघून ये, नाहीतर मी जीव देईन’, अशी धमकी दिल्याने रुपाली २७ जुलै रोजी त्याच्याकडे गेली. त्यादिवशी रुपालीने माहेरी फोन करून सांगितले की, माझा नवरा संतोष मला खेड कोर्टात आणून माझ्याकडे घटस्फोट मागत आहे. नंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर संतोष याने १ ऑगस्ट रोजी सासूला फोन करून रुपाली मेली असून तिला तुमच्याच घरी जाळून टाका, असे सांगितले.

- Advertisement -

विवाहितेचा मृतदेह आढळला

१ आॉगस्ट रोजी रुपालीचा मृतदेह वाकी येथेच भीमा नदीत तरंगत असल्याचे वाकी गावच्या पोलीस पाटलाने सांगितले. त्यानंतर रुपालीच्या वडिलांनी संतोषविरुद्ध पैशासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी पुढील तपास करीत आहेत.

कसा थांबणार हुंडाबळी?

तरुण वयातील मुली आपल्या वडिलांचे सर्वस्व सोडुन लग्नाच्या बंधनात जावुन सात जन्माची शपथ घेत सुखी संसाराची स्वप्न पहात असतात. मात्र सुखी संसाराला पैशाच्या मोहाची काळी नजर लागली कि, विवाहितेचा छळ सुरु होतो. हे सारं सहन होत नसल्याने शेवटी असे कठीण पाऊल उचलंल जातं. हे कधी थांबणार? असाच प्रश्न आता विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -