माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटचे कार्यकर्ते आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र सुनील पाटील आणि प्रताप पाटील तसेच वसंतराव शिंदे, आर. टी. स्वामी, अशोकराव भावके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सविनय कांबळे, हरिभाऊ जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. ‘आम्ही भाजपचे काम निष्ठेने करू’, अशी ग्वाही या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांची सध्या रीघ – चंद्रकांत पाटील
‘केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने विकासकामांच्या आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. या विश्वासामुळेच विरोधकांना आपले अस्तित्व संपण्याची भीती वाटते आहे’, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ‘भाजपात प्रवेश करणाऱ्यांची सध्या रीघ लागली आहे. भाजप सरकार आपल्यासाठी चांगल्या प्रकारे काम करीत आहे’, अशी खात्री सामान्य जनतेला वाटू लागली आहे. नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना क्षमतेप्रमाणे कामे दिली जातील, जबाबदाऱ्या सोपविल्या जातील. या कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील विकासकामे मार्गी लावता येतील’, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा – तिकीट वाटपानंतर भाजपमधून आऊटगोईंग होणार – नाना पटोले