समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ईव्हीएम मशीनच्या बिघाडावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय निवडणुकीसाठी खर्च होणारे ५० हजार कोटी रुपये पाण्यात गेल्याचे यादव म्हणाले आहेत. देशभरात आज सकाळपासून लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या ११५ जागांसाठी मतदान केले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० जागांसाठी मतदान सुरु आहे. दरम्यान अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांनी मतदानाचा हक्क बजावला. अखिलेश यादव यांनी ईव्हीएम मशीनच्या बिघाडावरुन प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अखिलेश यादव?
आज देशभरातील बऱ्याच मतदार केंद्रांमध्ये ईव्हीएम मशीन बिघाडाच्या घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्रातही दोन ते तीन मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीन बिघाडाच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही विविध मतदार केंद्रांवर आज सकाळी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी टीका केली आहे. अखिलेश म्हणाले की, ‘देशभरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी येत आहेत. याशिवाय बऱ्याच ठिकाणी भाजपलाच मत जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण न दिल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत. देशात ३५० पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आहेत. हा निष्काळजीपणा आहे.’
EVMs across India malfunctioning or voting for the BJP. DMs say poll officials untrained to operate EVMs. 350+ being replaced. This is criminal negligence for a polling exercise that costs 50,000 crs.
Should we believe DMs @ECISVEEP, or is something far more sinister afoot? pic.twitter.com/eGsGUUBWai
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 23, 2019