घरदेश-विदेशऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील 'त्याला' भारतात आणणार

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील ‘त्याला’ भारतात आणणार

Subscribe

ऑगस्टा वेस्टलँड या व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टरच्या खेरदीतील आरोपी आणि मध्यस्थी ख्रिस्तीयन मिशेलला आता भारताच्या हवाली केलं जाणार आहे. युएईच्या खालिज टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

UPA-2 च्या काळात ऑगस्टा वेस्टलँड या व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टरच्या खेरदीचा व्यवहार खूपच गाजला. या व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर हे डील रद्द करण्यात आले. १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणातील मध्यस्थ ख्रिस्तीयन मिशेलला आता भारताच्या हवाली केलं जाणार आहे. युएईच्या खालिज टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये ख्रिस्तीयन मिशेल युएईनं पोलिसांनी अटक केली होती. युएई सरकारच्या खास विमानानं ख्रिस्तीयन मिशेलला भारताकडे रवाना करण्यात आलं आहे. मंगळवारी अर्थात आज रात्री ११ वाजेपर्यंत ख्रिस्तीयन मिशेल दिल्ली विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर त्याला दिल्लीतील सीबीआयच्या स्पेशल कोर्टासमोर हजर केले जाईल. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप झाला. या व्यवहारामध्ये ख्रिस्तीयन मिशेल हा मध्यस्थी होता. जवळपास चार वर्षे केलेल्या भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये ख्रिस्तीयन मिशेलच्या प्रत्यार्पणाची विनंती सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने संयुक्त अरब अमिरातमधील न्यायालयामध्ये केली होती. त्यानंतर ख्रिस्तीयन मिशेलच्या प्रत्यार्पणाला न्यायालयानं मंजुरी दिली होती. २०१६ साली अंमलबजावणी संचालनालयाने ख्रिस्तीयन मिशेलविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. इंटरपोलनं त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील बजावली होती. त्यानंतर यूएईने मिशेलला गेल्यावर्षी अटक केली होती. अखेर ख्रिस्तीयन मिशेलला भारताच्या हवाली करण्यात येणार आहे.

काय आहे ऑगस्टा वेस्टलँड खरेदी प्रकरण

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी ३ हजार ६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती. इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली करण्यात आला होता. यामधील ८ हेलिकॉप्टर्स राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वापरली जाणार होती. तर उर्वरित ४ इतर कारणांसाठी वापरली जाणार होती. पण, देशातील विविध लोकांना ३६० कोटी लाच दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर हा व्यवहार १ जानेवारी २०१४ रोजी रद्द करण्यात आला.  या प्रकरणी माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, तत्कालीन प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची देखील नावं आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -