बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यात पुर्ण करावा यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिणार असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज सांगितले. तसेच या प्रकरणांची सुनावणी सहा महिन्यांच्या आत पुर्ण करावी, असेही केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात जी संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी हा निर्णय घेतला आहे. पटना येथे एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महिलांसोबत हिंसा आणि बलात्कारासारख्या घटना घडणे दुर्दैवी आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करायला हवी. त्यामुळेच देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बलात्कार आणि पोक्सो प्रकरणांचा तपास दोन महिन्यात पुर्ण करण्याची मागणी करणार आहे.