‘लागिरं झालं जी’ या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची अनोखी प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली. तसंच या दोन्हीही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरल्या. मालिका जरी संपली असली तरी देखील या व्यक्तिरेखांचा उल्लेख मात्र प्रेक्षक आवर्जून करतात. आजा आणि शितलीचे लाखो चाहते आहेत. ही मालिका संपल्यानंतर अनेक जण नाराज झाले होते. पण आता अजिबात नाराज होऊ नका कारण तुमची लाडकी लाडकी शितली पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे.
शीतल अर्थात अभिनेत्री शिवानी बावकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील आगामी ‘आलटी पालटी’ या मालिकेत शिवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालिका आणि मालिकेतील इतर कलाकारांबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. लोकप्रिय मालिका संपल्यानंतर आपला आवडता कलाकार पुन्हा कोणत्या भूमिकेत दिसणार या विषयी चाहत्यांना उत्सुकता असते. टीव्ही कलाकार मालिका संपल्यावर नाटक किंवा चित्रपटाकडे वळताना दिसतात.
“मला अभिनय करायचा आहे मग तो टीव्ही असो किंवा इतर कुठलंही माध्यम. शीतलच्या भूमिकेने मला काम करण्याचं समाधान दिलं आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आता मी जी भूमिका स्वीकारली आहे ती शीतलच्या अगदी विरुद्ध आहे. शूटिंगच्या वेळी मला फार त्रास होत नाही. हा सगळा माहोल आणि काम आवडतंय म्हणूनच मी हे करतेय.”
– शिवानी बावकर, अभिनेत्री