सहलीसाठी पश्चिम बंगालला गेलेले सुमारे २०३ नाशिकचे नागरिक लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले आहेत. ज्यागावात या नागरिकांनी तात्पुरता मुक्काम ठोकला आहे तेथील ग्रामस्थांनीही आता त्यांच्या रहिवासावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संबंधित नागरिक भीतीग्रस्त असून जिल्हाधिकार्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी पुढे आली आहे.
जुने नाशिक परिसरातील सुमारे दोनशे ते अडीचशे रहिवाशी दरवर्षी पश्चिम बंगालमधील एका दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. यंदा ही मंडळी १३ मार्चला पश्चिम बंगालला निघाली होती. धार्मिक विधी आटोपून ही मंडळी २३ मार्चला परतणार होती. मात्र त्याच काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याने त्यांना आता बाहेर पडणे दुरापास्त होत आहे. खासगी वाहने देखील बंद असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. सध्या तेथील खासदार मौसम नूर यांच्या बंगल्यात काही नागरिक थांबले आहेत. तर पंडवा गावातील वेगवेगळ्या घरांमध्ये प्रत्येकी चार ते पाच जण वास्तव्यास आहे. मात्र करोनाचे संकट अधिक गडद होत असल्याने आता गावकर्यांनीही त्यांच्या राहण्यावर आक्षेप घेणे सुरु केले आहे. दुसरीकडे दळणवळणाच्या सर्वच सुविधा लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे आता नाशिकला कसे परतावे असा यक्ष प्रश्न या नागरिकांना पडला आहे.
महिला, वृद्ध आणि बालकच जास्त
अडकलेल्या व्यक्तींमध्ये सुमारे २५ लहान मुले, ६० ज्येष्ठ नागरिक आणि सुमारे १०० महिलांचा समावेश आहे. तरुणांचे प्रमाण कमी असल्याने धावपळ करतानाही अडचणी उदभवत येत असल्याचे अडकलेल्या एका नागरिकाने सांगितले.
माल्ला स्टेशनपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या पंडवा या गावात आम्ही सध्या राहत आहोत. गावकर्यांनी आम्हाला तात्पुरत्या स्वरुपात आसरा दिला आहे. मात्र करोनाची भीती आता वाढल्याने आम्ही घरी परत जावे अशी गावकर्यांची अपेक्षा आहे. मात्र घरी परतायला कुठलेही वाहन नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनीच आता उपाययोजना सूचवावी.
-मोबीन पठाण, नाशिकचे नागरिक
आम्ही काही दिवसांपूर्वीच ट्रॅव्हल कंपन्यांशी बोलून शहराबाहेर पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांचा आढावा घेतला होता. परंतु पश्चिम बंगालला गेलेले नागरिक हे ट्रॅव्हल कंपनीकडून न गेल्यामुळे त्यांची एकत्रित माहिती आमच्याकडे नाही. तपास करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक