लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी मतदार संघात उमेदवार दिला असला तरीही नाशिकच्या बाबतीत मात्र त्यांनी अद्याप तोंडावर बोट ठेवलेले आहे. यंदा नाशिकमध्ये पक्षाचा उमेदवार तर नाहीच, शिवाय अन्य कोणत्याही उमेदवारास पाठिंबादेखील दिलेला नाही. या उलट भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मात्र, नाशिकमध्ये आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
नाशिक मतदार संघात साधारणत: २० ते २५ हजार मते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत. याशिवाय या पक्षाचे नेतृत्व अॅड. डी. एल. कराड, वसुधा कराड, तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे आदींकडे असल्याने सातपूर आणि सिडको या भागात पक्षाला चांगली किंमत आहे. या पार्श्वभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत अॅड. तानाजी जायभावे यांनी माकपच्या वतीने नशिब आजमावले होते. परंतु त्यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. पिपल्स बँकेच्या ठेवीदारांचा लढा असो वा दिल्ली- मुंबई कॉरिडॉरच्या नावाखाली नाशिकसह इगतपुरी, सिन्नर आणि निफाड परिसरातील सुमारे ५० हजार एकर जमीन शेतकर्यांपासून हिरावली जाऊ नये म्हणून त्यांनी लढा उभारला होता. संघटीत आणि असंघटीत कामगारांच्या प्रश्नांवरही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. असे असतानाही जायभावे यांनी अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने यंदा माकपने यंदा नाशिक लोकसभा मतदारसंगात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. महत्वाचे म्हणजे आजवर या पक्षाने कोणत्याही उमेदवाराला पाठींबा दिलेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नाशिक मतदार संघापासून माकप दूरच असल्याचे दिसते. या उलट कधीकाळी माकपच्या विचारसरणीशी मिळत्याजुळत्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नाशिकमध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठींबा दिला आहे. दिंडोरीत मात्र या पक्षाने माकपचे जिवा पांडू गावीत यांनी पाठींबा दिला आहे.