राफेल घोटाळा म्हणजे या सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा असून काँग्रेस सत्तेवर असताना जे विमान साडेपाचशे कोटींना घेण्याचा करार आम्ही केला होता, तेच विमान आता हे मोदी सरकार साडेसोळाशे कोटींना घेत आहे. प्रत्येक विमानामागे हजार कोटी या सरकारने आपल्या खिशात घातले असून आम्ही सत्तेवर आल्यावर छत्तीस हजार कोटींच्या या घोटाळ्याची चौकशी करून दोषींना तुरूंगात डांबणार आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. मुंबईचा डीपी प्लान दोनदा बदलून या देवेंद्र फडणवीस सरकारने दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आमचे सरकार आल्यावर या घोटाळ्यासह फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. ा. पुलवामाचा हल्ला हे कारगिलप्रमाणेच आपल्या गुप्तचर संस्थेचे अपयश असल्याचे सांगताना चव्हाण म्हणाले की, कारगिल युद्ध समाप्तीनंतर वाजपेयींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती.
वाजपेयींसारखी हिम्मत मोदी दाखवणार का, असा सवाल करत हे सरकार उलट शहिदांच्या हौतात्माचे राजकारण करून मते मिळवू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारच्या जुमलेबाजीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. मोदींनी २०१४ साली सत्तेवर येताना समाजातील प्रत्येक घटकाला वारेमाप आश्वासने दिली. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झाली याचा हिशेब देण्याऐवजी यावेळच्या जाहिरनाम्यातही भाजपने शेकड्याने आश्वासने दिल्याचे चव्हाण म्हणाले. याउलट काँग्रेसचा जाहिरनामा ऐतिहासिक आणि क्रांतीकारी असून देशातील वीस टक्के गरीबांना नजरेसमोर ठेवून तयार केलेली ‘न्याय’ ही योजना या जाहिरनाम्याचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
.