मुंबईत उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे, कडक उन्हात उभं राहून लिंबूपाणी प्यावं, थंड पेयजल प्यावं असं प्रत्येकाला वाटतं. पण, आता लिंबूपाणी पिताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, आपण पित असलेलं लिंबूपाणी अत्यंत नित्कृष्ट दर्जाचं असून ते प्यायल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम देखील होऊ शकतो. कुर्ला स्टेशनवर अस्वच्छ पाणी वापरुन बनवण्यात येणाऱ्या लिंबूपाण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि पालिका प्रशासनाला जाग आली. त्यानंतर, मुंबई महापालिकेने लिंबूपाणी विशेष मोहिम सुरू करुन लिंबू पाणी विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांकडून विशेष लिंबू पाणी मोहीम
महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये विशेष लिंबूपाणी मोहिम सुरू केली आहे. मुंबईत रस्त्यावर लिंबू पाणी विकणाऱ्यांकडून २०४ नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यातील ७५ टक्के नमुन्यात लिंबूपाणी मुंबईकरांना पिण्यासाठी योग्य नसल्याचं आढळलं आहे. म्हणजेच तब्बल १५७ नमुने हे नित्कृष्ट दर्जाचे आढळले आहेत. तर, फक्त ४७ नमुन्यांमध्ये पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचं आढळून आलं.
मुंबईतील सर्व शीतपेय विक्रेत्यांची तपासणी मोहिम पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली होती. यात ७५ टक्के लिंबूपाणी पिण्यास योग्य नसल्याचं आढळून आलं. तपासणीसाठी संशयास्पद आढळून आलेले २०४ नमून घेण्यात आले होते. यातील ४७ नमूने योग्य होते. तर, तब्बल १५७ नमुने हे पिण्यायोग्य नसल्याचं आढळलं आहे.
– डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी वैद्यकीय अधिकारी, मुंबई महापालिका
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अशा अनेक मोहिम राबवल्या जातात. पण, आता विशेष लिंबूपाणी मोहिम सुरू केली गेली आहे. त्यामुळे, मुंबईकरांनी रस्त्यावरील लिंबूपाणी, पाणी, बर्फ अशा कोणत्याच गोष्टींचं सेवन करु नये. या विक्रेत्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. घरातूनच पाण्याची बॉटल घेऊन निघावं, असा सल्ला ही डॉ. केसकर यांनी दिला आहे.