मुंबईत नोकरीसाठी उपनगरातून रोज प्रवास करणारे नोकरदार काय हाल सोसतात, हे मुंबईकरच जाणोत. गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या आणि तरिही वेळेवर न येणाऱ्या लोकल ट्रेनची अडचण मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मुंबईकरांची ही व्यथा आता थेट लोकसभेत मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीमधील खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत नियम ३७७ अन्वये चर्चा उपस्थित करत डोंबिवलीमध्ये गर्दी आणि वेळेवर ट्रेन धावत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच डोंबिवलीवरुन लोकलची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी केली.
लोकसभेत शून्य प्रहरात बोलत असताना सुळे म्हणाल्या की, “डोंबिवली येथून सुटणाऱ्या ट्रेनला डोंबिवली लोकल म्हणून बोललं जातं. मात्र ही डोंबिवली लोकल कल्याणहून सुटते. त्यामुळे ती आधीच इतकी भरून येते की डोंबिवलीतील प्रवाशांना त्यात चढताही येत नाही. तसेच लोकल वेळेवर नसल्यामुळे देखील प्रवाशांची गैरसोय होते.”
लोकलच्या गर्दीबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रार करुनही अधिकाऱ्यांनी कोणत्याही उपाययोजना राबविलेल्या नाहीत, असेही सुळे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच कल्याणचे मनसे नेते राजेश कदम यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. ज्यामध्ये कल्याण स्थानकावरील पुलाच्या पायऱ्या चढण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्याचे दिसत होते. पुलाची दुरुस्ती अनेक दिवसांपासून सुरु असल्यामुळे लोकांना त्रासाचा सामोरा कराव लगत आहे. भविष्यात अपघात टाळण्यासाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीच सुळे यांनी केली आहे.