मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मराठा आरक्षणावर केंद्राने भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या सुनावण्यांमध्ये केंद्राने आपली भूमिका मांडावी अशी मागणी मोदींनी आपल्या केली आहे. याआधी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही केंद्राने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. आज मंगळवारी खुद्द अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठा आरक्षण प्रकरणात पंतप्रधानांची भेट घेण्याची विनंती केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी २५ जानेवारीच्या सुनावणीकडे सर्व मराठा संघटना तसेच महाविकास आघाडी सरकारचे लक्ष लागले आहे. याच मुद्द्यावर आता केंद्राने पुढाकार घ्यावा अशी मागणी महाविकास आघाडीमधून होत आहे. मराठा आरक्षण कस अबाधिक राहिल, एसईबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या विषयात केंद्राने भूमिका घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
शरद पवार पंतप्रधानांना भेटणार
आगामी दिवसात होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांनी भेट घेणार आहेत. मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्लीत शरद पवार यांची आज मंगळवारी भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या विषयावर शरद पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच भेट घेणार आहे.