कोकण विकासाची वर्जमुठ करून कोकणातील सहाही जिल्यांमध्ये कार्यरत असलेल्या कोकण विकास आघाडीचे यंदाचे ४१वे वार्षिक अधिवेशन बुधवार, २५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता मुंबई-माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होत आहे.
विकासांच्या प्रश्नांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात येणार
मोहन केळुसकरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनाचे ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नार्वेकर हे स्वागतध्यक्ष असून यावेळी संघटनात्मक कामकाजावर प्रथम चर्चा होणार आहे. त्यानंतर कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाला, मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्ग या कामांना गती द्यावी, पश्चिम किनारी सागरी महामार्ग सर्व पुलांसह त्वरीत पुर्ण करावा, बोट आणि अंतर्गत जलवाहतूक सुरु करावी, एस. टी. चे खाजगीकरण करू नये, पट संख्ये अभावी प्राथमिक शाळा बंद करण्याच्या विरोधात आंदोलन उभारणे, अर्धवट जलसिंचन योजना पुर्ण कराव्यात, बागायतदारांच्या पिकांना शासनाने हमीभाव बांधून द्यावा, पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न त्वरित सोडवावे.
कोकणातील उद्योजकांच्या समस्या, शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, पर्यटनाला चालना देण्यासाठी सी वर्ल्ड प्रकल्प सुरू करण्यासह चिपी विमानतळ लवकर पुर्ण करून विमान सेवा सुरु करावी, शासनाने कोकणचा अनुशेष भरून काढावा, प्रशासनाच्या सोयीसाठी आणि विकासाला गती देण्यासाठी कोकणात लहान-लहान तालुक्यांची निर्मिती करावी, स्थानिकांना नोकरीत आरक्षण मिळावे आदी विकासांच्या प्रश्नांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.तरी कोविआच्या कार्यकर्यांसह हितचिंतक, सस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सरचिटणीस सूर्यकांत पावसकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा – LIVE – झारखंडमध्ये आज मतमोजणी; कोण मारणार बाजी?