घरमहाराष्ट्रकोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारच्या सोबत; उद्योगपतींनी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकारच्या सोबत; उद्योगपतींनी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे. उद्योगांनी औषधे पुरवणे, बेड्स सुविधा वाढवणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य सरकारला शक्य ती मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी उद्योगांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.

कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग-व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्रालाही झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आतापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून सुविधा उभाराव्यात आणि कार्यप्रणाली अवलंबवावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फिकी, सीआयआय तसेच इतर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधून राज्याला या काळात ज्या गोष्टींची गरज आहे, त्यात पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.

- Advertisement -

उद्योगांचे टास्क फोर्स तातडीने स्थापन करणार

राज्यात ज्याप्रमाणे आरोग्यविषयक टास्क फोर्स आहे, तसेच कोविडसंदर्भात राज्य सरकारच्या समन्वयाने पुढील काळात काम करण्यासाठी उद्योगांचे एक टास्क फोर्स तातडीने निर्माण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यांनी मुख्य सचिवांना दिले. राज्याची निकड लक्षात घेऊन प्राधान्याने आपापल्या परीने ऑक्सिजनची उपलब्धता तातडीने करून देण्यात येत आहे, असे उद्योगांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. याशिवाय विलगीकरण बेड्स सुविधा वाढवणे, चाचणी केंद्रे स्थापन करणे आणि लसीकरण वाढवणे यामध्ये उद्योग पुढाकार घेऊन लगेच कार्यवाही सुरु करतील, असेही सांगण्यात आले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या बैठकीत आपले मत मांडले. या बैठकीत उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, दीपक मुखी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, संजीव बजाज, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी.त्यागराजन, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, अश्विन यार्दी, एस. एन सुब्रमनियन, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, सुलज्जा फिरोदिया, समीर सोमय्या, आशीष अग्रवाल आदि उद्योगपती सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -