घरताज्या घडामोडीशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजे युवांसाठी दिपस्तंभ

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजे युवांसाठी दिपस्तंभ

Subscribe

स्वतःच्या पायावर उभे राहताना, वेगळं काहीतरी करून दाखविताना समाजातील विविध घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही जेंव्हा ध्येय बनते. सातत्याने त्यादिशेनेच प्रत्येक पाऊल टाकले जाते ,तेंव्हा असे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन करणारे ठरते. संस्कृती, परंपरा, खेळ, आरोग्य, शिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था ना नफा – ना तोटा तत्वावर चालवणे तसे पाहिले तर खूप अवघड. मात्र ‘ असाध्य ते साध्य करीता सायास’ ,एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्वाने २५ डिसेंबर १९९७  मध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान येत्या डिसेंबरमध्ये २५व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. एका व्यक्तीने लावलेले हे रोपटं आज वटवृक्ष बनले आहे. ज्यांनी यासाठी झोकून कार्य केले, ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आणि त्यांचा सामाजिक जीवनाचा हा प्रवास समाजासाठी दिशादर्शक ठरला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर या गावातील व्यावसायिक कुटुंबातील लक्ष्मीकांत खाबिया हे वयाच्या विसाव्या वर्षी वेगळं काहीतरी करण्याची इच्छा आणि आत्मनिर्भर होण्यासाठी जिथे कुणी ओळखीचे नाहीत अशा पुणे शहरात येतात.प्रारंभीचा प्रवास खूपच संघर्षमय. बस स्थानकात बाकड्यावर रात्रीचा मुक्काम आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात अंघोळ. असे सुरुवातीचे काही दिवस.स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहणाऱ्या लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रारंभी गॅरेजमध्येही वास्तव्य केले. अपार कष्टाची जोड असेल आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा असेल तर सारे काही शक्य आहे, हे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्शवत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.तसे पाहिले तर संस्कृती, परंपरा, खेळ, आरोग्य, शिक्षण यासह अन्य घटकांसाठी एकाच व्यासपीठाखाली कार्य करणारी स्वयंसेवी संस्था तशी दुर्मिळच. मात्र शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यात अव्वल ठरलीय.

- Advertisement -

समाजकारण आणि राजकारणात त्यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेब यांचा प्रभाव.त्यातूनच शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा शुभारंभ शरद पवार यांच्याच हस्ते झाला. लक्ष्मीकांत खाबिया यांना समाजकारणाचे बाळकडूही पवारसाहेबांकडून मिळाले आणि त्यांच्या संघर्षमय वाटचालीचे पवार साहेब हेही साक्षीदार.परिणामी कुठे काय हवे ? कसे कार्य करावे ? असे मार्गदर्शन लाभताना कौतुकाची थाप आणि त्यातून प्रोत्साहन मिळत गेले.तसेच विठ्ठलशेठ मणियार , खासदार सुप्रियाताई सुळे, विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सतत अनमोल सहकार्य मिळाले.

जैन धर्माचे गाढे अभ्यासक असलेले आजोबा स्व. सुखलाल खाबिया व वडील स्व. मोहनलाल खाबिया यांच्याकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा सार्थकी लावताना समाजातील सर्वच घटकांसाठी भरिव काम कसे करता येईल याकडेच त्यांचे सतत लक्ष असते. तरुणांनी जागरूक व्हावे, समाजासाठी कार्य करावे,गरजुंना हातभार लावावा हाही एक उद्देश. लोकांसाठी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था हे खऱ्या अर्थाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने सिद्ध केले आहे. त्यामुळेच आज २० जिल्ह्यात प्रतिष्ठानचा विस्तार झाला आहे आणि हजारो युवा स्वयंसेवक त्यातून निर्माण झाले आहेत. मी समाजाचा, समाज माझ्यासाठी हे ब्रीदवाक्य बाळगून हे युवा स्वयंसेवक प्रतिष्ठानचे कार्य विस्तारत आहेत.एकप्रकारे समाजाप्रती सेवाभाव वृद्धिगंत होत आहे.

- Advertisement -

आषाढी – कार्तिकी एकादशीला संत कवींनी लिहिलेल्या अभंग – गायनाचा ‘विठू माऊली माझी’ हा कार्यक्रम असो अथवा एड्स, स्त्रीभ्रूण हत्या, समाजातील ज्वलंत प्रश्नांवर जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम, जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा, शेतीशी संबंधित ;पण नाविन्याची कास धरू पाहणाऱ्या होतकरू विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी ‘आपली माती,आपला महाराष्ट्र ‘ही स्पर्धा उभ्या महाराष्ट्रात गाजली. या स्पर्धेतून वक्तृत्व, अभिनय, नृत्य, वादन, गीत, समूहगान याचे दर्शन घडले गेले, किंबहुना मनोरंजनातून प्रबोधनाला चालना मिळाली.

पारंपरिक लोकगीतांची नव्या पिढीला ओळख व्हावी व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा यासाठी जागरण गोंधळ स्पर्धा, गीतरामायण स्पर्धा,नाट्यलेखनाची ,नामवंत साहित्यिकांची परंपरा जोपासण्यासाठी पु. ल. देशपांडे महाकरंडक एकांकिका स्पर्धा, महाराष्ट्राचे शिल्पकार व लोकप्रिय नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने विशेष एकांकिका स्पर्धा,मराठी चित्रपटगीतांचे जादूगार व लावणी गीतांचे शहेनशहा असे ज्यांना संबोधले जाते, ते श्रेष्ठ संगीतकार राम कदम यांच्या नावाने कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्राचा लोकाश्रय व राजाश्रय लाभलेल्या लावणीचा वारसा कायम रहावा, त्यातील आशय कायम रहावा आणि कलाकारांना मानाचे स्थान असावे या उद्देशाने सुरु केलेल्या पुणे लावणी महोत्सवातून नवीन कवी, लेखक, नृत्यांगना, वादक यांना संधी आणि उचित वातावरण निर्मितीला चालना, चित्रपट क्षेत्रात पदार्पण करून त्याद्वारे बळीराजाची व्यथा, सामाजिक आशयांची प्रभावीपणे मांडणी,शालेय विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘कलाजत्था’ हे विशेष शिबीर, विदर्भात कृषी क्रांती करणारे ,शैक्षणिक व सांस्कृतिक पाया घालण्याचे भरीव कार्य करणारे भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आदिवासी, गरीब शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन अभियान, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा, प्रगतीचा आलेख मांडणारी ‘पन्नाशीचा महाराष्ट्र ‘ ही खुली पेंटींग स्पर्धा महाराष्ट्राला भावली. पंढरपूरचा वारी सोहळा हे महाराष्ट्राचे एक वैभव.

महाराष्ट्र ही संतांची भूमी. संस्कृती, लोकजीवन याचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवाह – पुणे ते पंढरपूर यावर ‘भक्तीसागर’मधून घडवलेले एकरूपतेचे दर्शन. देशाच्या राजकारण व समाजकारणात दिशादर्शक असणाऱ्या आदरणीय शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल देशातील उद्योग जगतातील दिग्गजांनी वेध घेतलेल्या उद्यमशील व इंड्रस्टीयस या पुस्तकांची निर्मिती यासह अनेक उपक्रम गाजले, लक्षवेधी ठरले. समाजातील अनेक घटकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविणाऱ्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने कोरोना या जीवघेण्या रोगाच्या साथीतही आर्थिक दुर्बल, गरजू वर्गाला मदत केली आहे आणि करत आहे. साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रात नाविन्याची कास धरून, परंपरा जोपासताना प्रबोधनाचा आणि युवकांच्या शक्तीचा ‘ गजर’ सातत्याने होत आहे. त्यामुळेच शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य अथांग समुद्रात जहाजांना दिशादर्शक ठरणाऱ्या ‘दीपस्तंभा’सारखे ठरत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

राज्यात काय देशातही पहिलाच उपक्रम !

एड्स, स्त्रीभ्रूण हत्या, समाजातील ज्वलंत प्रश्नांवर जागरूकता निर्माण व्हावी आणि सकारात्मकतेने प्रभावी प्रबोधन व्हावे यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा घेतली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच काय अभंग व भजन स्पर्धेतून जनजागृती या संकल्पनेचे स्वागतही जोरदार झाले आणि केवळ राज्यच नाही तर देशातही हा उपक्रम पहिलाच व आदर्शवत ठरला.


हेही वाचा – नोकरी गेली, उद्योग सुरु करत आहात…सावधान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -